Thursday, April 22, 2010

कतरा कतरा जीने दो....






काही गोष्टी या अगदी मेड फ़ॉर इच आदर असतात. सिनेमाच्या बाबतीत बोलायचं तर आरडी आणि गुलझार, खय्याम आणि गझल-आशा, रेखा आणि आशा.....कधी विचार केलायत की उमरावजान मध्ये रेखा नसती तर? सिनेमात जानच आली नसती. उमराव जान म्हणजेच रेखा हे इतकं फ़िट्ट बसलं होतं की नव्या उमरावजानमध्ये ऐश्वर्या (कमालिची सुंदर दिसूनसुध्दा) आपल्याला तरी बुवा फ़ारशी आवडली नाही. रेखाच्या उमरावजामधली तिची ठाव घेणारी नजर, घायाळ कटाक्ष, कमालिची सुंदरता (ऍण्ड व्हॉट अ ग्रेस)....हे सगळं अजरामर झालंय अगदी मोनालिसाच्या चित्रासारखं. तिच्यासारखी तीच.
आजचा विषय उमरावजान नाही तर "इजाजत" आहे. एकीकडे अदावाली उमराव आहे आणि दुसरीकडे इजाजतमधली शालिन, स्वाभिमानी सुधा आहे. रेखा का आवडावी? याचं उत्तर या जबरी रेंजमध्ये आहे. आवडत्या चित्रपटांच्या यादीत आणि झोपेतून उठवून बघ हा सिनेमा असं सांगितलं तरी जो बघायला आवडतो तो इजाजत. गुलझार, आरडी, रेखा, नासिरूद्दीन, आशा भोसले हे इतके इनग्रिडियन्टस असताना आणखी वेगळी मेजवानी काय पाहिजे? प्रत्येक चित्रपटाला एक लय असते. ती दिसत नाही तर जाणवते. इजाजतची लय ही शांत समंजसपणाची आहे. मायाचा वेडेपणा टिपिकल पती पत्नी और वो वाला वाटत नाही आणि सुधावर होणारा अन्यान चैन पडू देत नाही. वास्तवात जर असं घडलं तर काय होईल तेच सिनेमातही होतं. म्हणजे आपल्या पतिच्या आयुष्यातल्या प्रेयसीसाठी आणि दोघांच्यातल्या न संपणार्‍या ओढीसाठी पत्नी फ़ारकत हेऊन वेगळी होते, नवं आयुष्य निवडते. पझलचे तुकडे फ़िट्ट बसतात तरिही "कुछ मिसिंग है बॉस" वाटत रहातं. मला या सिनेमातलं काय आवडतं तर याची कथा मांडण्याची पध्दत. निवांत तब्येतीत कथा साकारत जाते. कुठेही घाई नाही, उरकण्याची वृत्ती नाही. सगळं कसं एका लयीत पण शांतपणानं साकारत जातं. मेलोड्रामा करायला वाव असतानाही तो मोह टाळून एक समंजस कथा गुलझार ज्या पध्द्तिनं मांडतात...मान गये बॉस! एखादी कादंबरी वाचल्याचा फ़ील हा सिनेमा देतो. पान पान उलटवत कथा उलगडत जाते. कथेत गाणी येत नाहीत तर भेटत जातात. पहिल्याच बारिशो कें पासून सिनेमाचा मूड पक्का पकडून ठेवला जातो. मग मेरा कुछ सामान, खाली हाथ शाम आई है, कतरा कतरा जिने दो....सगळा प्रवास कथेचं बोट धरून होतो. संवादाचं काम गाणं साधतं आणि मुड आणखी बनत जातो.
ज्या प्रश्नांची उत्तरं सिनेमाभर आपण कधी मायाच्या नजरेतून कधी सुधाच्या तर कधी महिन्दर (महेंद्र नव्हे)च्या नजरियातून शोधत रहातो त्याचं कोणतंही उत्तर न मिळता एक चुटपुट लावून चित्रपट संपतो.

मुझे जा ना कहो...


सुंदर गाणं जमायला सूर लागावा लागतो, उत्तम पदार्थ बनण्यासाठी सगळे घटकपदार्थ अचूक पडावे लागतात आणि छान सिनेमा बनायला अभिनयापासून कथेपर्यंत सगळी भट्टी जमून यावी लागते. असा मस्त जमलेला चित्रपट आहे बासुदांचा "अनुभव". बासुदांच्या तीन चित्रपटांच्या सेरीजमधला हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. लग्नानंतर काही वर्षांनी स्थिरावलेलं पती पत्नीचं नातं आणि त्यात काही कारणानं काही काळ उठणारे तरंग असा कथाविषय असाणारा हा चित्रपट. ब्लॆक व्हाईट असुनही कमालिचा सुंदर बनल आहे. हा चित्रपट बघताना आतून एक बेचैन बुलबुला सतत अस्वस्थपणे हलत असतो, याचं कारण याची प्रत्येक फ्रेम चित्रपटाच्या कथेशी इमान राखून समोर येते. चित्रपट बघताना नक्की कसं वाटतं माहित आहे? भर दुपारी तुम्ही कधी एखाद्या निरव ठिकाणच्या डोहावर गेलाय? आजुबाजुला चिटपाखरू नसताना, कसलाही आवाज, हालचल नसताता तो गडद हिरवा खोल डोह कसा कंटाळवाणा चुपचाप पसरलेला असतो? आपल्याला ते पाहून खडा टाकून या चित्रात जरा जीवंतपणा आणावासा वाटतो. तसं हा चित्रपट पहाताना जाणवत रहातं. लग्नानंतर काही वर्षांनी पतीपत्नीचं काहिसं एकसुरी होणारं नातं अगदीं परफेक्ट समोर येतं की आपण या दोघांत तिसरे होउन फिरत रहातो. यातलं गीता दत्तचं वर सांगितलेलं गाणं चित्रपटात इतकं सहजपणानं येउन जातं की आपल्या लक्शातही येत नाही, आपण गाणं पाहिलं. घरकाम करताना एखादी ग्रुहिणी जसं गुणगुणत एका लयीत काम आवरत असते तसं हे गाणं येतं आणि जातं.
गाणं दोन भागात आहे, चित्रपटची एकदा नायिका ,म्हणजे तनुजा अंघोळ करताना गुणगुणत असते आणि दुसर्यांदा नायक
नायिका म्हणजे संजीव कुमार आणि तनुजा खुप दिवसांनंतरचा जुना निवांतपणा अनुभवत असतात तेंव्हा. यातला दुसरा भाग जास्त तरल झाला आहे. अलिकडे एकमेकांसाठी रिकामा वेळच मिळत नाही अशी सल असणारं, तरूणपणाकडून प्रौढपणाकडे चाललेलं एक तरूण जोडपं, कार्यमग्न पती आणि कलाकार, रसिक पण रिकामपणानं घर सांभाळणारी ग्रुहिणी. सगळ निरस कंटाळवाणं चाललेलं आहे, एकमेकाविरूध्द तक्रार करण्याचंही आता रूटिन बनलं आहे, जे चाललंय त्यात आता काही बदल होणार नाही हे सत्य स्वीकारून एकमेकासोबत रहाणारे पती पत्नी आणि एक दिवस अचानकच तो चुकार निवांत दिवस या जोडप्याच्या आयुष्यात येतो. ऊन्हाची तलखी पावसाच्या एका सरसरून आलेल्या सरीमुळं कशी धुवून जाते तसं होतं. सगळे शिकवे गिले दूर होतात, अगदी निवांत चाललेल्या या दिवसाची दुपार डोक्यावर येते आणि अचानक पाऊस बरसायला लागतो, बस्स! आणखी काय पाहिजे? बाहेर कोसळणार्या सरी, आणि खिडकीच्या तावदाना पलिकडून डोकावणारा निशिगंध, पाण्याचे टपोरे थोंब माळलेली निशिगंधाची ताजी फुलं आणि हे जोडपं. केवळ केवळ आणि केवळ इतक्या भांडवलावर हे कमालिचं रोमॆंटिक गाणं येतं. तनुजाचे टाईट क्लोजअप फ्रेममधून हलूच देत नाहीत. गोड दिसणारी तनुजा या गाण्यात,"दो जुडवा होठों की बात कहो आंखो से...मेरी जान" असं म्हणताना आणखिनच खट्याळ गोड दिसलीय.