#SB
हा बहुचर्चित सिनेमा थिएटरमध्ये बघायचा राहून गेला होता. काल नेटफ्लिक्सवर पाहिला आणि एक अस्वस्थता वाटली. तीच शेअर करतेय.
भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.....आहेत? हा प्रश्न स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं उलटल्यावरही अनुभव सिन्हाला आपल्या सिनेमातून विचारावा लागतो. जशी या देशाची समाजव्यवस्था जटील गुंतागुंतीची आहे तसंच या प्रश्नाचं उत्तरही साधं सरळ नाही.
याचं कारण , एका भारतात अनेक भारत नांदतात. एक भारत आहे , ज्यात मी आणि माझ्यासारखेच तुम्ही सगळे रहाता. जातपात मानणं (खासगीत आणि सार्वजनिक जीवनातही) गेल्या दोन पिढ्यांत नाहीसं झालंय. जातीचा काॅलम शाळाकाॅलेजात लिहायच्यावेळेस सरफेसवर येतो तेवढंच.
एक भारत आहे, जिथे या जातीच्या भींती अजूनही अभेद्य आहेत. हे एक वेगळंच जग वाटावं अशा पध्दतीचं सामाजिक वातावरण असणारा देश. दुर्दैवानं या देशाचं अस्तित्व नाकारता येत नाहिए. आर्टिकल 15 हा अत्यंत हुशारीनं लिहिलेला आणि सिनेमॅटिकली मांडलेला सिनेमा आहे. वास्तवातल्या घटनांचा (खरेतर) आधार घेत काल्पनिक मांडणी करताना तो सत्य असत्याच्या तुकड्यांची गोधडी उसवून आपल्यासमोर ठेवतो. सिनेमा कोणाचिही बाजू न घेता तटस्थपणे सगळ्या बाजू कथानकाच्या ओघातच समोर ठेवत जातो. आपण दी एण्डला पोहोचेपर्यंत वास्तवाचं भान घेऊन आलेलो असतो.
उत्तर भारतातल्या एका कसब्यात, जिथे जाती व्यवस्था अजूनही कडवी आहे तिथे शहारात जन्मलेला शिकलेला आणि आजच्या तटस्थ, बदललेल्या, पुरोगामी देशाचं, युथचं प्रातिनिधित्व करणारा तरूण पोलिस अधिकारी येतो. आल्या आल्याच तीन दलित मुलींच्या बेपत्ता असण्याची केस त्याच्या हाती येते. हाती येते म्हणण्यापेक्षा दाबलं 'जात' असलेलं प्रकरण तो बळेच हाती घेतो. या केसच्या अनुषंगाने उलगडत जातो एक 'भारत'. अछुत असलेला भारत, सवर्णपणाचा माज असलेला भारत, अछुतांना 'ते' म्हणत साधं रोजचं माणसासारखं जगणंही नाकारणारा भारत, जन्मासोबत जातीची लेबलं घेऊन आलेली माणसं आणि ही लेबलं कसोशिनं सांभाळणारी माणसं असलेला भारत. तुम्ही आणि मी कधीच न पाहिलेला, अनुभवलेला मात्र ऐकलेला भारत...
जातिच्या उतरंडित ब्राह्मण वर नाक असलेले म्हणतानाच आयनच्या प्रत्येकाला जात विचारण्यातून बहुजनांतही अभिमानानं मिरवले जाणारे जरा वरचे जरा खालचे sc, obc जातीचे शिक्के दिसतात आणि सगळं किती खोकलं आहे हे उघड होतं. ब्राह्मणांना शिव्या घालताना आपल्या खालच्या जातीवर आकस असणारा बहुजनही दिसतो आणि या देशातल्या किळसवाण्या जातीव्यवस्थेचं उघडं वास्तव नागडं होऊन जातं.
स्क्रिनप्लेमधलं प्रत्येक पात्र फार हुशारीनं क्राफ्ट केलेलं आहे. ब्राह्मण लेबल असणारा पण त्यानं फरक न पडणारा आयन (आयुषमान), ब्राह्मणच पण त्याचा माज असलेला ब्रह्मदत्त सिंह (मनोज पहावा), खालच्या जातीतला मात्र कष्टानं शिक्षण घेत पोलिस दलात आलेला जाटव (कुमुद मिश्रा), दलितांचा युवा नेता निषाद (मोहम्मद अयुब) आणि त्याला साथ देणारी त्याची धाडसी प्रेयसी आणि बेपत्ता मुलीतल्या एकीची बहिण गौरा (सयानी गुप्ता). या सगळ्या पात्रांच्या अवती भवती फिरत कथा पुढे सरकत जाते.
कथेचा क्लायमॅक्स एका पातळीवर भावनिक समाधान देणारा तर दुसर्या बाजूला अस्वस्थता देणारा करून योग्य नोटवर दीएण्ड येतो.
मला या सिनेमातली आवडलेली हीच गोष्ट आहे. सिनेमा सगळ्या पलिस्थितीवर 'केवळ भाष्य' करतो. काय असलं पाहिजे याचं लफ्फेदार संवादी स्वरूप किंवा तात्विक भाषण टाळतो मात्र त्याच वेळेस छोट्या छोट्या प्रसंगातून काय असायला पाहिजे यावरही 'सूचक भाष्य' ही करतो.
याचं मस्त उदाहरण म्हणजे, आयन टपरीवालीला जात विचारतो आणि त्याचवेळेस मेरा भारत महान लिहिलेला ट्रक धाडधाड आवाज करत जातो ज्यात तिचा आवाज दबतो.
ऐंशीच्या दशकात येता तर समांतर, आर्ट फिल्मचा शिक्का बसून मुख्यप्रवाहातून बाजूला ठेवला असता हा सिनेमा. मात्र गेल्या काही वर्षांत बाॅलिवुड हटके विषय मुख्यप्रवाहात मांडतो आहे आणि त्याला प्रेक्षकांची (मासची) पसंतीही मिळतेय. एकिकडे प्रेक्षक सिनेमा अधिक चांगल्या पध्दतिनं बघायला शिकला आहे आणि दुसर्या बाजूला आजच्या परिस्थितीत अशा विषयावर, अशी मांडणी करणारा सिनेमा बनविण्याचं स्वातंत्र्य सढळपणानं आहे हे खरोखरच चांगलं चिन्ह नव्हे का?
#articale15
#NETFLIX