Sunday, June 12, 2016

स्टोरी टेलर इम्तियाज



इम्तीयाजच्या सिनेमांतली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट काय माहितीय? तो कधीच कसला आव आणून गोष्ट सांगत नाही. त्यातलं साधं सोपं आणि हळवं जे असतं ते अगदी अलगद मनाला भिडतं. मग सो़चा था ना मधला मिस्टर कन्फ़्युज असो की जब वी मधली गीत. त्यांचं प्रेमातलं भांबावणं, रस्ता चुकणं मग चुकत माकत पुन्हा पटरीवर येणं असू दे की हायवेमधली वीराचं घरापासून भरकटणं असो. अगदी रॉकस्टारमधली आणि तमाशातली न जमलेली भट्टीही कंटाळवाणी वाटत असली तरिही बघाविशी वाटते. 
गोष्ट सांगायची प्रत्येक दिग्दर्शकाची आपली एक स्टाईल असते इम्तियाज गोष्ट कशी सांगतो, तर छान फ़ुलवत...बारकावे टिप...कधी कथेपासून भरकटत.. कधी तिचं बोट घट्ट पकडून ठेवत तो समोरच्याला कथेत गुंगवून ठेवतो. त्याच्या कथेतले
नायक नायिला कमी बोलतात (अपवाद गीतचा) त्यांचे चेहरे जास्त बोलतात. म्हणूनच एरवी बत्तमिझ दिल करत नाचणारा रणबीर रॉक स्टार आणि तमाशात अगदी वेगळा वाटतो. एरवी मटकणारी बेबो गीत म्हणून जास्त गोड वाटते. तिचं पूर्वार्धातलं बडबड करत समोरच्याला वैताग आणणं आणि नंतर एकदमच गप्प होऊन मिटून जाणं मनाला भिडतं. तमाशातली तारा एकाचवेळेस कॉर्पोरेट वुमन म्हणूनही कन्व्हिन्सिंग वाटते तशीच ती वेदच्या प्रेमात पडलेली आणि त्याच्या अनोळखी चेहर्‍यामुळं भांबावलेली साधी मुलगी म्हणूनही भावते. इतकंच काय पण आयेशा टाकियासारखी बरी हिरोईनही सोचा ना था मधे खूप छान वाटते.
कथेतला साधेपणा अगदी सहजपणानं तो समोरच्याला मान्य करायला लावतो म्हणूनच करोडपती विराचं ट्र्क ड्रायव्हरच्या प्रेमात पडणं जितकं सहजशक्य वाटतं तसाच वेद्ला आलेला न्युनगंडही विचित्र वाटत नाही. एकिकडे वास्तवाच्या नावाखाली पडद्यावर अवतरलेला शिवराळ अर्वाच्यपणा तर दुसरीकडे अगदी परग्रहावरचा वाटावा असा संस्कारी ओव्हरडोस, रोमॅंटिक हळवेपणा यात इम्तियाजचे चित्रपट जास्त खरे वाटतात. 

सैराट झालं जी

हा सिनेमा कसा आहे कसा नाही आणि बरंच काही....सगळं अगदी नको इतकं बोलून झालंय. अनेकांनी सैराट दहा वेळा पंचवीसवेळाही पाहिलाय. मला त्यांच्या सहनशक्तीबद्दल आदरच आहे तरिही मी अनेक आठवडे हा चित्रपट पाहिलाच नव्हता त्यामुळे माझ्याकडे मात्र काय विचित्र आहेस असं बघायचे सगळे. परवा एकदाचा पाहिला. आणि खरं अगदी मनापासून सांगायचं तर मला हा सिनेमा ठीक ठीक वाटला. म्हणजे मराठी चित्रपटांच्या तुलनेत उजवा आणि हिंदीच्या तुलनेत आणखि एक प्रेमकथा इतका बरा. सैराटची सोशलमिडिया झिंग बघता मी असं काही म्हणणं धाडस किंवा वेडेपणा होणार हे माहित आहे तरिही मला तरी मनापासून असंच वाटलं. म्हणजे यातले विनोद असोत की संवेदनशिल प्रसंग सोशल मिडियावर मला सगळंच जरा ओव्हररेटेड वाटलं. एकूणच जरा बटबटीतपणाकडे कललेलं. टिपिकल दक्षिणी छापाचे सिनेमे असतात नां तसं. इमोशन्स, नायिकेचं उफ़ाड्याचं दिसणं असो की नाच गाणी सगळंच जरा जास्तच.
कथा आणि मांडणी हा पूर्णपणे लेखक- दिग्दर्शकाचा निर्णय असतो त्यामुळे हे असं का ? तसं का नाही? वगैरेला काही अर्थ नाही. तरिही वास्तवाच्या जवळ जायच्या मोहापायी कथा वळणं घेत असतानाही त्यात तद्दन फ़िल्मीपणा डोकावत रहातोच. कदाचित हा इतका विचार या सिनेमासाठी केलाही नसता पण एकूण भारावल्या गेलेल्या जनतेमुळे इतका विचार करावासा वाटला. आपल्याला हा का भिडला नाही. अगदी आलाय मोठा साबण लावून वर बाकीचे आडवे तिडवे हसत असताना आपल्या चेहर्‍यावर फ़क्त एक हसू येऊन गेलं. हे असं का झालं असावं याचा विचार करता करता मनात आलं ते या ब्लॉगमधे लिहिलंय त्यामुळे हे अर्थातच वैयक्तिक मत आहे.
सगळ्यात महत्वाचं मला जाणवलं ते म्हणजे यातलं प्रेम हे शाररिक आकर्षणातून (नायक नायिकेचं वय गृहित धरून) सुरू होतं. थेटपणानं नाही दाखवलं तरी ते सूचवल्यासारखं अनेक ठिकाणी वाटतं. या चित्रपटानं संवेदनशिल विषय हुशारीनं हाताळलाय वगैरे आरती ओवाळलेल्यांनी ओलेत्या अर्चीकडं दूर्लक्ष केलंय. विहिरीत परशा उडी मारून वर जाताना अर्चीला ज्या ऎन्गलनं कॅमेरा न्याहळतो ती परशाची नजर समजायची का? म्हणून ती हुशारी वगैरे इथं व्यावसायिकच ठरतं. दुसरं महत्वाचं म्हणजे चित्रपटाची चर्चा होत राहिल अशा पध्दतीनं केलेलं मार्केटिंग.
जाता जाता यानिमित्तानं आठवलं म्हणून अवांतर- जर्नलिझमच्या दुसर्‍या वर्षाला असताना एफ़टीआयची एक कार्यशाळा झाली होती . विषय होता- एक्सप्लोयटेशन ऑफ़ वुमेन इन इंडियन सिनेमा. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती पैकी एक होता चित्रपटातल्या गाण्यांचे शब्द आणि गाणी चित्रीत करताना लावले जाणारे कॅमेरा ऍन्गल. ओलेत्या अर्चीला पाहून त्या चर्चेची आठवण आली.  असो.
बाकी अजय अतुल चं संगित हे या चित्रपटाचं इंजिन आहे. त्याची झिंग चित्रपटापेक्षा किंचित जास्तच आहे. आणि अजय अतुल त्यांचं काम नेहमीच चोख करतात. असो. तर कोणाला काहीही वाटो मला हा एक बरा चित्रपट वाटला. म्हणजे मराठी चित्रपटांच्या इतिहासात माहेरच्या साडीचा जसा सर्वात जास्त कमाई करणारा असा उल्लेख आहे तसा आणि तितपतच उल्लेख करता यावा असा. बाकी आशय विषय मांडणी आणखि दहा वर्षांनी इतकी भिडेल का ही शंकाच आहे. जसा सिंहासन असो की उंबरठा आजही हे चित्रपट खिळवून ठेवतात. त्यांचं मराठी सिनेमांच्या प्रवासात उल्लेखनिय स्थान आहे अगदी त्यांनी कोटीच्या कोटी कमावले नसले तरिही. त्या तुलनेत सैराट हे एक मार्केटिंगच्या कौशल्यानं खपवलेलं उत्तम उत्पादन आहे. 

Saturday, June 11, 2016

Te3n

Te3n चं कसं झालंय नां, तरिही राही काही उणे. म्हणजे अमिताभ त्याच्या भूमिकेत फ़िट आहे, नवाझुद्दीन भाव खातो आणि विद्या तिला मिळालेल्या फ़ुटेजमधेही लक्षात राहिल असं काम करते. आता हे सगळं हे तिघेही मंझे हुए कलाकार त्यांच्या सगळ्याच चित्रपटांत करतात त्यामुळे त्यात वेगळं उल्लेख करावं असं काही नाही. आता कथा. तर खूप वेगळी म्हणावी तर तसंही नाही. एका पॉईंट्वर चतुर प्रेक्षक समजून जातो कथानक काय वळण घेणार हे.

अमिताभ नावाचं गारूड दिवसें दिवस जास्तच पक्कं होत चाललंय. पिकू मधला खव़चट, कुजकट म्हातारा असो की Te3n मधला खांदे पाडून चालणारा जॉन. या वयातही त्याला साजेशा भूमिका लिहिल्या जात आहेत आणि त्या प्रत्येक भूमिकेत तो भाव खाऊन जातोय हे सगळं अमिताभचा पंखा   म्हणून माझ्यासाठी तरी खूप भारी आहे. तरिही या नव्या चित्रपटात मात्र पटकथेनं असे काही चार दोन गोते खाल्लेत की एकूण परिणामाचा विचार केला तर तो कोमट होतो. सुरवातीला या चित्रपटाच्या जातकुळीला साजेशी वातावरण निर्मिती करतो, कथानक त्याच्या गतीनं पुढे सरकत रहातं, काही धागे सुटल्यासारखे वाटायला लागतात, पकड ढिली होतेय असं वाटतानाच मध्यंतरापर्यंतचा प्रवास झालेला असतो.
रहस्य त्यातही मर्डर मिस्टरी असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी खुनी कोण असावं याचे सतत अंदाज लावणं आणि कथानकानं चकवा देणं. ही भट्टी जमली तरच अनपेक्षित शेवट परिणामकारक ठरतो. या बाबतीत हा चित्रपट अपयशी ठरतो कारण शक के दायरे में इतकी कमी पात्रं आहेत की मध्यंतरानंतर काही मिनिटातच चतुर प्रेक्षक अंदाज लावून मोकळा होतो. खरं तर अपरिचित आणि बिनचेहर्‍याचा खुनी अपेक्षित दहशतही निर्माण करतो मात्र नंतर ती दहशत म्हणावी तशी मान करकचून धरत नाही. इथे चित्रपट घसरायला सुरवात होते याचं कारण याचवेळेस जॉननं (अमिताभ) त्याचा पुरावे गोळा करण्याचा प्रवास संपवत आणलेला असतो. हा प्रवास आणखि फ़ुलता तर परिणाम जास्त चांगला झाला असता.
आता इतकं सगळं असूनही समोर घडणार्‍या घटनांत प्रेक्षक गुंतून रहातो. माहित असलेल्या शेवटाकडे चित्रपट नेमका कसा जातो हे पहावसं वाटतं ही या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू.
खरं तर चित्रपटाची जातकुळी शांत आहे आणि तो तसाच आहे. थंड डोक्यानं गुन्हा केल्यासारखा. पण का कोण जाणे मधेच घाई घाईत काही प्रसंग "आटपल्या"मुळे परिणामाला बाधा आली आहे. विद्या काही करेल करेल असं वाटत असतानाच तिची भूमिका संपूनही जाते. तिच्याजागी इतर कोणी असल्यानं काहीच फ़रक पडला नसता असं नंतर वाटतं. त्या अर्थानं तिला कथानकानं वाया घालवलंय.
नवाझुद्दीन मिस्टरी गडद करण्यात हातभार लावतो. त्याच्याकडे बघून इसके दिमाग में क्या चल रहा है? हे फ़िलिंग सतत येत रहातं.
अमिताभच्या खांद्यावर अर्थातच सर्वात जास्त जबाबदारी आहे आणि त्याचा खांदे पाडून चालणारा जॉन ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. शेवटचं "हक है मुझे" गाणं आणि अमिताभचे त्यातले भाव तर केवळ अप्रतिम आहेत.
या सगळ्याच्या बरोबरीनं आणखि एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे "कोलकता". या शहराचं नाव घेतलं तरी एक विशिष्ट प्रतिमाच डोळ्यासमोर तरळते आणि ते जुनं (जुनाट म्हणण्याचा मोह आवरतेय कारण तो जुनाटपणा पडद्यावर इतका खुलला आहे की कथानक वजा हे कोलकता परिणाम आणखी कमी होईल). कहानी चित्रपटातही दुर्गा पूजेचा माहोल आणि टिपिकल कोलकता आपल्याला दिसतं. कथानकासोबत ते पुढे जातं तसंच याही चित्रपटात या कोलकता दर्शनाचा महत्वाचा भाग आहे.
हे सगळं जरी असलं तरी मधेच कथानकाचा पाय घसरतो. तो सावरायला जात असतानाच प्रेक्षकांना दीड एण्डचा अंदाज येतो.  असा घसरत पुन्हा सावरत शेवटाकडे जात मनात काही प्रश्न ठेवत चित्रपट संपतो.