Thursday, October 23, 2008

रेनकोट


माझ्या आवडत्या चित्रपटातला हा एक. ऐश्वर्या आणि अजय देवगणचा ’रेनकोट’. रीपरीप पावसाचा रुतू. अशाच पावसाळ्यातला एक कंटाळवाणा शेवाळलेला दिवस आणि एकेकाळच्या प्रेयसीच्या घराचा पत्ता शोधत आलेला नायक. त्याला तिचं घर सापडतं तो आत येतो आणि दोघांच्या गप्पा भुतकाळाचा धागा पकडून चालू होतात. ती त्याला सांगते की नवर्यासोबत तिचा संसार सुखानं चाललेला आहे. मोठेपणाच्या गोष्टी सांगत रहाते आणि तो जळतोय का याचा अंदाज घेत असतानाचा त्याची परिस्थिती अजमावत रहाते. एककेकाळी तिच्यावर फ़क्त प्रेम करणारा आणि सुखी संसाराची स्वप्नं बघणारा तो तिला पटवून देतोय की तो देखिल आता "बडा आदमी" बनला आहे. दोघे एकमेकाचा अंदाज घेत असताना प्रेक्षक म्हणून आपणही पडद्यावर घडणार्या प्रसंगांचा अंदाज लावत असतो. कंटाळवाणेपणा जसा सिनेमातल्या दिवसावर पसरलेला आहे तसाच तो नायिकेच्या देहबोलीवर, नायकाच्या बोलण्यात आणि तिथून झिरपत तो आपल्याही पर्यंत आलेला आहे. अगदी कंटाळवाणं असुनही आपण त्या कथेत गुंतत जात रहातो. मोठ्या घरात अवाढव्य फ़र्निचर सांभाळत राहिलेली नायिका तिच्या साध्या रहाण्यामागचं कारण देत रहाते. सततच्या बंद दारांमागचं कारण देत रहाते. नायकाला खटकणार्या गोष्टी आपल्याही पल्ले पडत नाहीत. अशाच वाक्यांतून दोघांची कथा पुढे सरकत असतानाच गतकाळातले काही तुकडे येत रहातात. नायिका त्याला जेवणाचं विचारते तो सांगतो की त्याची सेक्रेतरी जेवणासाठी वाट बघत असेल. ती एक क्षण मत्सरानं कशीनुशी होते आणि पुढच्याक्षणी त्याला हक्कानं जेवायला सांगते. डाएटिशियननं जास्त जेवायला बंदी आणल्यामुळे घरात स्वयंपाक केलेला नाही या सबबीखाली बाहेरून जेवण आणायला जाते आणि पावसापासून वाचण्यासाठी नायकाचा रेनकोट घेऊन जाते. ती बाहेर गेल्यावर नायक सगळ्या खिडक्या उघडतो आणि एक आगंतुक घरात येतो. हा आगंतूक म्हणजे खरं तर नायिकेच्या घराचा मालक असतो आणि थकलेलं भाडं वसूल करण्यासाठी नायिकेच्या घराबाहेर उभा असतो. त्याला टाळण्यासाठी नायिका दारं बंद करून बसत असते. मोठेपणाचा सगळा आव असतो. प्रत्यक्षात खायची मारामार असते. आज नायकानं दार उघडल्यामुळे किमान त्याला घरात प्रवेश तरी मिळालेला असतो. या दोघांच्या संवादातून आधिच्या संवादांचा अर्थ उलगडत जातो.नायक आणि नायिकेच्या कथेमागची कथा समोर येत रहाते. नवर्याच्या श्रीमंतिचा बडेजाव करणारी नायिका जशी भिकेकंगाल असते तसाच नायकही फाटका असतो. धंदापाण्यासाठी मित्रांकडून उधार उसनवारी करायला आलेला नायक मित्रांकडे राहून त्यांच्याकडूनच जमलेले सगळे पैसे नायिकेच्या घराच्या थकलेल्या भाड्यापोटी मालकाला देतो आणि काही महिने तरी तिला घरातून बाहेर न काढण्याची विनंती करतो. नायिका आल्यावर जेवण करून तो निघून जातो. घरी पोहोचल्यावर तिच्या आठवणिनं आणि तिच्यावरच्या परिस्थितीनं व्याकूळ होत रहातो. मित्राची बायको रेनकोट वाळत घालायला जाते त्यावेलेस तिला खिशात काही तरी सापडतं म्हणून ती नायकाला द्यायला येते. तो पहातो तर नायिकेनं त्याच्यासाठी काही पैसे आणि एक चिठ्ठी लिहिलेली असते. रेनकोटच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्याच्या परिस्थितीची कल्पना तिला आलेली असते. त्याला काही मदत करावी म्हणून तिनं पैसे गुपचुप त्याच्या खिशात टाकलेले असतात. मात्र पैसे देतानाही ती आपला बडेजाव मिरवायला विसरत नाही. चिठ्ठीत तिनं लिहिलेलं असतं की, घाईघाईत नवरा चेकबुक ठेवून जायचा विसरल्यानं हातातल्या बांगड्या गहाण टाकून पैसे आणले आहेत आणि नवरा आल्यावर आणखी काही मदत ती त्याला करेल. रात्र आणखी गडद शेवाळी होते निराश झालेला दु:खी नायक छताकडे नजर लावून बसलेला असतो तर त्या काळोखात कोणालाही पत्ता न लागू देता नायिका सामान सुमान घेऊन घर बदलत असते.

ऐश्वर्या आणि अजय ही दोनच पात्रं सबंध चित्रपटभर दिसतात. अन्नू कपूर घरमालकाच्या भुमिकेत आगंतूकासारखा हजेरी लावून जातो. या दोघांचा सहज अभिनय आणि रुतु पर्णोचं दिग्दर्शन यामुळे चित्रपट एक खास छाप सोडतो यात शंकाच नाही. यातली प्रत्येक फ़्रेम बोलकी आहे. पार्श्वभुमीवर पावसाची सततची रीपरीप मनावर साठत जाते. चित्रपट संपवताना तो अगदी रीतसर "दी एंड" असा न करता तो सहज विरघळून गेल्यासारखा आणि टॊचणी लावत, विषयाचा चिमटा तसाच घट्ट रूतवून चित्रपट संपतो.

Sunday, September 14, 2008

रसदार अंगूर

एखाद्याच मूड अत्यंत खराब असेल तर त्याला संजीव कुमार आणि देवेन वर्माचा "अंगूर" दाखवावा. त्याचा मूड परत येणार याची दोन हजार टक्के हमी आहे. मी हा चित्रपट आजवर कितीवेळा पाहिला असेल याची गणतीच नाही. या चित्रपटात संजीव कुमार आणि देवेन वर्मा या दोघांचेही डबल रोल आहेत. संजीव कुमारचं विनोदाचं टायमिंग पहायचं असेल तर या चित्रपटाला पर्याय नाही.
थोडक्यात कथा,(ज्या करंट्या लोकांनी हा चित्रपट अजुनही पाहिलेला नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांनी माझ्यासारखाच वेड लागल्यासारखा पाहिला आहे त्यांच्यासाठीही रीकॆप म्हणून कथा)

श्री. राजतिलक आणि सौ> राजतिलक यांना जुळे मुलगे होतात, त्यांना ते अशोक म्हणून संबोधायला लागतात. त्यानंतर ते आणखी एक जुळ्या मुलांची जोडी दत्तक घेतात त्यांची नावं ते बहादूर ठेवतात आणि दुर्दैवानं या चारांची पांगापांग होते. चारजणांच्या दोन जोड्या बनतात. हे सगळे मोठे होतात आणि संजीव कुमार (मालक-अशोक)-देवेन वर्मा (नोकर-बहादूर) अशा जोड्या बनतात.

संजीवकुमार नं.१ (अशोक)आणि देवेन वर्मा नं.१ (बहादूर)रेल्वेतून एका गावाला जमिनिचा व्यवहार करण्यासाठी चाललेले असतात. त्यांच्याजवळ एक लाख रूपये रोकड असते. संजीव कुमारला डिटेक्टिव्ह कथा वाचण्याची आणि त्याप्र्माणे विचार करण्याची हौस असते याचा नोकर असणारा देवेन वर्मा हा भांग चढविणारा जरा चापलूस नोकर असतो. हे दोघे योगा योगानं संजीव कुमार नं२ (अशोक) आणि देवेन वर्मा नं.२ (बहादूर)रहात असलेल्या गावातच येतात. ही जोडगोळी अद्याप अविवाहीत असते. या दोन नंबरच्या जोडीतला संजीव कुमार गावातला प्रतिष्ठित सरकारी अधिकारी आहे आणि त्याचा नोकर झालेला देवेन वर्मा बिचारा भोळा आहे. संजीव कुमारचं लग्न त्याला लहानाचं मोठं केलेल्याच्या मुलिशी म्हणजे मौसमी (सुधा)चटर्जिशी होतं आणि तो त्याची मेहुणी, म्ह्णजे तनू (दिप्ती नवल) देवेन वर्मा त्याची बायको प्रेमा (अरूणा इराणी)यांच्यासोबत रहात आहे. मौसमी याच्याकडे हिर्याच्या हाराची मागणी करते त्यापायी या दोघांचं जोरदार भांडण होतं, हार आणल्याशिवाय घरी येणार नाही असा पण करून तो घरातून निघतो. इकडे दुसर्या जोडगोळीचं आगमन होतं. आता शहरात दोन अशोक आणि दोन बहादूर होतात. हे सगळे उलट सुलट पध्दतिनं एकमेकासमोर येत रहातात. म्हणजे बाजारात अशोक नं.१ आणि बहादूर नं.२ भेटतात, त्यावेळेस अशोक त्याला विचारतो की तू हॊटेल सोडून इथे का आलास? बहादूरला वाटतं की नवरा बायकोतलं भांडण इतकं विकोपाला गेलंय की आपले साहेब घर सोडून हॊटेलवर रहायला गेले. घरी येउन तो हे सुधा आणि तनुला सांगतो आणि वर साब पगला गये म्हणून शेरा मारतो. इकडे अशोक नं.१ हॊटेलवर परततो आणि बहादूर नं.१ ला फैलावर घेतो की हॊटेल सोडून माझ्यामागोमाग का आलास? बहादूर परोपरीनं सांगतो की मी इथेच आहे मात्र डिटेक्टिव्ह अशोकची शंका दूर होत नाही. सगळा दिवस हा लपंडाव ज्या पध्दतीनं होत रहातो तो पाहून हसून हसून मुरकुंडी वळते. अखेरीस तर लग्न झालेले अशोक आणि बहादूर घराबाहेर आणि ब्रह्मचारी घरात असा मामला होतो. या दोघांना वाटतं की आपल्याकडे असणार्या एक लाखांमुळे चोरांची मोठी गॆंग आपल्याला फसवतेय तर या दोघांशी संबंधित लोकांना यांचं वागणं एकाएकी का बदललं हेच समजत नाही. या चौघांच्या गोंधळात भर घालण्यासाठी ज्वेलर, पोलिस इन्स्पेक्ट,टॆक्सी ड्रायव्हर हजर आहेत. सगळा सावळा गोंधळ अखेरीस अर्थातच उलगडतो आणि ही सगळी भावंडं असल्याचंही समजतं.


हा सगळा गुंता ज्या क्र्मानं कळस गाठत जातो त्याला तोडच नाही. सगळी पात्रं आणि त्यांचा गोंधळ हसवून पुरेवाट करतो. अखेरचा बहादूर फाशी लावून घेण्यासाठी दोर विकत घ्यायला जातो तो प्रसं ग असो की पोलिस चौकितला हाराच्या बेपत्ता होण्याचा प्रसंग असो, सगळी भट्टी परफेक्ट जमली आहे.


गुलझारचा हा चित्रपट म्हणजे विनोदी चित्रपट कसा असावा याचा आदर्श नमुना आहे, याच कथेवर गुलझार यांनीच याधिही एक चित्रपट बनविला होता मात्र दुद्रैवानं तो जमला नाही. मात्र गुलझारला या कथानकाबद्दल इतका जबरी विश्वास होता की त्यांनी पुन्हा नव्यानं टिम जमवली आणि यावेळेस पूर्ण ताकदीनिशी कोणतिही उणिव न राखता चित्रपट काढला. यावेळेस मात्र त्यांचा अंदाज अचूक ठरला आणि चित्रपट झकास जमला. मूळ कथानक शेक्सपियरच्या "कॊमेडी ऒफ एरर्स"वर बेतलेलं आहे. आणि ते मूळ कथानकाइतकच अस्सल वठलं आहे. हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला आणि आजही तितकाच ताजा आहे. यातलं "प्रितम आन मिलो" हे गाणं म्हणजे तर धमाल आहे. ज्यांनी हा चित्रपट अजुनही पाहिलेला नाही, त्यांना शिनू आवर्जून सांगेल की एकदा तरी बघाच.

Friday, September 12, 2008

हा गलगल्या म्हणजे डोक्याला ताप आहे


केदार शिंदेचा गलगले निघाले पाहिला. म्हणजे एका बेसावध क्षणी डोक्यात दगड पडला आणि तिकिट काढून हा चित्रपट पाहिला. तीन तास गलगल्यानं इतकं पिडलं म्हणून सांगू. हा सिनेमा बघताना एकच विचार सतत मनात येत होता, केदार शिंदे नावाच्या गुणी मुलाला झालंय तरी काय? याच्याक्डे आम्ही किती अपेक्षेनं पहात होतो. यानं अगं बाई अरेच्चा नावाचा चित्रपट बनवून मराठी चित्रपटही बघायचे असतात असा विश्वास दिला, यंदा कर्तवय आहे हा चित्रपट बनवून हा विश्र्वास औट घटकेचा नाही हे दाखवलं आणि माझा नवरा तुझी बायको सारख्या चित्रपटापासून गडी जो उतारावर धावत चाललाय तो थांबायलाच तयार नाही. लंडनचा डबेवाला सहन करावा लागला. आणि आता गलगलेनं तर कळस केला. मुळात सही रे सही वरून एखादं पात्र सही उचलून चित्रपटात आणायचा अट्टाहास का? हेच समजलं नाही. ते ही इतक्या वर्शांनंतर? आता भरतचा गलगल्या इतक्यावेळा या ना त्या रूपात आलाय की त्याच्या त्या बावळट स्टाईलची ओकारी यायला लागलीय. उगाच खपतंय म्हणून किती खपवावं याला काही सीमा? भरतला साथ द्यायला किमान नायिका तरी बरी असावी की नाही?तेही नाही. नायिका म्हणून जरा फिगर बिगर असावी लागते तर इकडे सगळा आनंदी आनंदच आहे. त्यातून ही बाई तिरक्या ओठानं बोलत रहाते. कंबर की कमरा असली फिगर असणारी नायिका आम्ही पैसे खर्च करून का म्हणून पहायची? केदारच्या पहिल्या दोन नायिका छान होत्या. ही तिसरीच कुठून शोधून आणली यानं? मराठीत देखण्या चेहर्यांची कमतरता आता तरी नाही. सिनेमातली फ्रेम फ्रेम, पात्र न पात्र वैताग आहे नुसता. वात आणणारी पात्रं आणि त्यांचे कंटाळवाणे विनोद, संवाद हे पाहून केदारला आता जरा थंड बस बाबा, असं सांगावसं वाटतं. काही कोणी तुझ्यावर जबरदस्ती नाही करत सिनेमे काढ म्हणून. पण उगाच सले सिनेमे काढून वैताग देउ नको, आणि यापुढे भरतला नायक म्हणून अजिबात घेउ नको. या चित्रपटात नायक नायिका जरी दुसरे घेतले असते तरी जरा ताजेपणा आला असता. मात्र भरतलाच पुन्हा गलगले बनवून नाटकातलाच गलगल्या इथे आमच्या माथी मारून तू काय मिळवलंस रे बाबा केदू? काही प्रसंगात तर गलगले चक्क वेडा किंवा मनोरूग्ण वाटला माहितीय? झी सारखा मातब्बर मोहरा हाताशी असताना केदारसारख्या हुश्शार मुलानं इतका टुक्कार सिनेमा बनवावा याचा वैताग जास्त आला. कोणी लाखभर रूपये दिले तरी आई शप्पथ या गलगल्याच्या वाट्याला जाऊ नका. तो चाललाय नां? जाऊ द्या त्याला तसाच पुढे. उगाच अडवू नका. काय संमजले?

Wednesday, August 13, 2008

सिनेमाच्या दिवसांच्या पोस्ट लिहिता लिहिता लक्षात आलं की, या विषयावर स्वतंत्र ब्लॊगच चालू करावा म्हणून मोठ्या उत्साहात सगळे सोपस्कार तर पार पाडले, ब्लॊगचं बाळंतपण करून बारसंही पार पडलं आणि गाडं इथेच थांबलं. कारणं सांगायची तर यादी मोठी आहे. त्यामुळी ती देतच नाही. सरळ ब्लॊग लिहायला सुरवात करते; पण आत्ता नाही. अजून दोन चार दिवसांनी, चांगला मुहूर्त बघून. बघा तुम्हालाही सापडला तर मला कळवा. सध्या सायोनारा. वादा निभाऊंगी, सायोनारा!