Saturday, June 11, 2016

Te3n

Te3n चं कसं झालंय नां, तरिही राही काही उणे. म्हणजे अमिताभ त्याच्या भूमिकेत फ़िट आहे, नवाझुद्दीन भाव खातो आणि विद्या तिला मिळालेल्या फ़ुटेजमधेही लक्षात राहिल असं काम करते. आता हे सगळं हे तिघेही मंझे हुए कलाकार त्यांच्या सगळ्याच चित्रपटांत करतात त्यामुळे त्यात वेगळं उल्लेख करावं असं काही नाही. आता कथा. तर खूप वेगळी म्हणावी तर तसंही नाही. एका पॉईंट्वर चतुर प्रेक्षक समजून जातो कथानक काय वळण घेणार हे.

अमिताभ नावाचं गारूड दिवसें दिवस जास्तच पक्कं होत चाललंय. पिकू मधला खव़चट, कुजकट म्हातारा असो की Te3n मधला खांदे पाडून चालणारा जॉन. या वयातही त्याला साजेशा भूमिका लिहिल्या जात आहेत आणि त्या प्रत्येक भूमिकेत तो भाव खाऊन जातोय हे सगळं अमिताभचा पंखा   म्हणून माझ्यासाठी तरी खूप भारी आहे. तरिही या नव्या चित्रपटात मात्र पटकथेनं असे काही चार दोन गोते खाल्लेत की एकूण परिणामाचा विचार केला तर तो कोमट होतो. सुरवातीला या चित्रपटाच्या जातकुळीला साजेशी वातावरण निर्मिती करतो, कथानक त्याच्या गतीनं पुढे सरकत रहातं, काही धागे सुटल्यासारखे वाटायला लागतात, पकड ढिली होतेय असं वाटतानाच मध्यंतरापर्यंतचा प्रवास झालेला असतो.
रहस्य त्यातही मर्डर मिस्टरी असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी खुनी कोण असावं याचे सतत अंदाज लावणं आणि कथानकानं चकवा देणं. ही भट्टी जमली तरच अनपेक्षित शेवट परिणामकारक ठरतो. या बाबतीत हा चित्रपट अपयशी ठरतो कारण शक के दायरे में इतकी कमी पात्रं आहेत की मध्यंतरानंतर काही मिनिटातच चतुर प्रेक्षक अंदाज लावून मोकळा होतो. खरं तर अपरिचित आणि बिनचेहर्‍याचा खुनी अपेक्षित दहशतही निर्माण करतो मात्र नंतर ती दहशत म्हणावी तशी मान करकचून धरत नाही. इथे चित्रपट घसरायला सुरवात होते याचं कारण याचवेळेस जॉननं (अमिताभ) त्याचा पुरावे गोळा करण्याचा प्रवास संपवत आणलेला असतो. हा प्रवास आणखि फ़ुलता तर परिणाम जास्त चांगला झाला असता.
आता इतकं सगळं असूनही समोर घडणार्‍या घटनांत प्रेक्षक गुंतून रहातो. माहित असलेल्या शेवटाकडे चित्रपट नेमका कसा जातो हे पहावसं वाटतं ही या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू.
खरं तर चित्रपटाची जातकुळी शांत आहे आणि तो तसाच आहे. थंड डोक्यानं गुन्हा केल्यासारखा. पण का कोण जाणे मधेच घाई घाईत काही प्रसंग "आटपल्या"मुळे परिणामाला बाधा आली आहे. विद्या काही करेल करेल असं वाटत असतानाच तिची भूमिका संपूनही जाते. तिच्याजागी इतर कोणी असल्यानं काहीच फ़रक पडला नसता असं नंतर वाटतं. त्या अर्थानं तिला कथानकानं वाया घालवलंय.
नवाझुद्दीन मिस्टरी गडद करण्यात हातभार लावतो. त्याच्याकडे बघून इसके दिमाग में क्या चल रहा है? हे फ़िलिंग सतत येत रहातं.
अमिताभच्या खांद्यावर अर्थातच सर्वात जास्त जबाबदारी आहे आणि त्याचा खांदे पाडून चालणारा जॉन ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. शेवटचं "हक है मुझे" गाणं आणि अमिताभचे त्यातले भाव तर केवळ अप्रतिम आहेत.
या सगळ्याच्या बरोबरीनं आणखि एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे "कोलकता". या शहराचं नाव घेतलं तरी एक विशिष्ट प्रतिमाच डोळ्यासमोर तरळते आणि ते जुनं (जुनाट म्हणण्याचा मोह आवरतेय कारण तो जुनाटपणा पडद्यावर इतका खुलला आहे की कथानक वजा हे कोलकता परिणाम आणखी कमी होईल). कहानी चित्रपटातही दुर्गा पूजेचा माहोल आणि टिपिकल कोलकता आपल्याला दिसतं. कथानकासोबत ते पुढे जातं तसंच याही चित्रपटात या कोलकता दर्शनाचा महत्वाचा भाग आहे.
हे सगळं जरी असलं तरी मधेच कथानकाचा पाय घसरतो. तो सावरायला जात असतानाच प्रेक्षकांना दीड एण्डचा अंदाज येतो.  असा घसरत पुन्हा सावरत शेवटाकडे जात मनात काही प्रश्न ठेवत चित्रपट संपतो.

3 comments:

meg said...

Although i havent seen the movie...still agree with ur views... very aptly u have highlighted its positives n negatives... in ur usual very intriguing style... !!

शिनु said...

Thanks meg.

शिनु said...

Thanks meg.