Friday, May 7, 2021

फ़ाळणीनंतर भारतात परतलेल्या भावंडांनी देशाला घाबरवलं

 



 

भारत –पाकिस्तान फ़ाळणी नंतर भारतात आलेलं एक कुटुंब. डोक्यावर कर्जाचा बोजा असलेल्या या कुटुंबातल्या भावंडानी नंतर सिनेमा क्षेत्रात खळबळ माजवून टाकली. ही भावंडं म्हणजेच रामसे बंधू. भारतीय भयपट म्हणलं की पहिलं नाव डोळ्या समोर येतं ते रामसे बंधूंचंच. अशा या भावंडाची ही गोष्ट-

 

स्वातंत्र्यपूर्व काळात रामसे ब्रदर्सचे वडील फ़तेहचंद रामसिंघानी यांचं पाकिस्तानातल्या कराचीमधे वीजसाहित्य विक्रीचं दुकान होतं. कुटुंब कबिला मोठा होता आणि दुकान ठीक चाललं होतं. त्याकाळात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि रामसिंघानींच्या दुकानात बहुतेक गिर्‍हाईक ब्रिटीश असत. मात्र अडचण ही होती की दुकानावर लावलेल्या पाटीवरचं नाव ब्रिटीशांना नीट वाचता येत नसे. रामसिंघानी इतकं मोठं नाव वाचताना इंग्रजी गिर्‍हाईकांना त्रास व्हायचा. हे लोक फ़तेहचंदांना रामसे सदृष काहीतरी हाक मारायचे. फ़तेहचंदांनी विचार केला की आपल्या ग्राहकांना जे सोयीचं पडत आहे ते नाव धारण करावं जेणेकरुण त्यांना नाव उच्चारताना त्रास होणार नाही. फ़तेहचंदांनी नविन बोर्ड बनवून त्यावरचं रामसिंघानी नाव बदलून रामसे लिहिलं. आता गिर्‍हाईकही खुष झालं. दुकान चांगलं चालायला लागलं होतं मात्र ही परिस्थिती फ़ारकाळ टिकली नाही. १९४७ ला देशाची फ़ाळणी होऊन धर्मावर आधारीत दोन देश बनले. फ़तेहचंद रामसे आपला कुटुंब कबिला घेऊन भारतात मुंबईत आले.

मुंबईत आल्यावरही फ़तेहचंदांनी आपला जुनाच व्यवसाय नव्यानं चालू केला. मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवरील अप्सरा सिनेमाच्या समोर त्यांनी वीज साहित्याचं दुकान थाटलं. नविन दुकान, नविन शहर असलं तरिही त्यांनी नाव मात्र रामसेच ठेवलं. ते बदललं नाही. रामसिंघानी आता कायमचेच रामसे झाले होते. त्याकाळातला सुप्रसिध्द मर्फ़ी रेडिओ फ़तेहचंदांच्या दुकानाता प्रामुख्यानं विक्रिला होता. नविन शहर, गिर्‍हाईकांची मानसिकता नवी. धंद्याचा सूर काही ठीक लागत नव्हता. अशातच फ़तेहचंदांचं लक्ष नव्यानंच बहराला येऊ पहात असणार्‍या एका क्षेत्राकडे गेलं. हे क्षेत्र होतं सिनेमा निर्मितीचं. फ़तेहचंदांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरायचं ठरवलं. १९५४ साली आलेला शहीद-ए-आजम भगत सिंह हा निर्माता म्हणून फ़तेहचंदांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट फ़ारसा चालला नाही. यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर आणि सुरैय्या यांना मुख्य भुमिकांत घेऊन रुस्तुम सोहराब (१९६३) बनविला जो सुपरहिट ठरला. फ़तेहचंदांच्या नावावर एक फ़्लॉप एक हिट होता अशातच त्यांनी तिसर्‍या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली. एक नन्ही मुन्नी सी लडकी हा त्यांचा पुढचा चित्रपट अत्यंत वाईट पध्दतीनं फ़्लॉप झाला. हे अपयश इतकं जोरदार होतं की फ़तेहचंदांनी चित्रपटसृष्टीचा नाद सोडण्याचं आणि चित्रपट निर्मिती न करण्याचं ठरविलं.

त्यांनी हा निर्णय घेतला असला तरिही नियतीनं वेगळाच डाव त्यांच्यासमोर मांडलेला होता लवारच रामसे हे नाव भारतीय भयपटांचं जनक बनणार होतं आणि हे घडायला कारण ठरला फ़्लॉप चित्रपटातला एक सिन.

त्याचं झालं असं की फ़तेहचंदांची मुलं, श्याम आणि तुलसी चित्रपटगृहात चित्रपट झळकला की प्रेक्षकांत बसून तो बघत असत. जेणेकरून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समजाव्यात. एक नन्ही मुन्नी सी लडकी बघायलाही हे दोघे भाऊ चित्रपटगृहात गेले. त्यांना तो सिनेमा बघताना लक्षात आलं की एक विशिष्ट सीन चालू असताना प्रेक्षक कमालिचे उत्कंठीत झाले होते. या सिनमधे एक चोरी घडते ज्यात पृथ्वीराज  कपूर भारी भक्कम पोषाख घालून, मास्क लावून आणि उंच बूट घालून म्युझियममधे चोरी करायला जातात. तुलसी रामसेंनी निरिक्षण केलं की या सिनमधे पृथ्वीराज एखाद्या सैतानासारखे भासत होते आणि पोलिसांनी मारलेल्या गोळ्याही त्यांना काहीही इजा न करता बाजूला पडत होत्या हे बघून प्रेक्षक हैराण झाले होते. पडद्यावर हे सिन बघताना थिएटरमधे टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या. लोकांना काय बघायला आवडतं हे रामसे बंधूंना समजलं होतं.

चित्रपट पाहून परत आल्यावर या दोघांनी वडिलांशी चर्चा केली. आपण हॉरर चित्रपट बनवुया असा प्रस्ताव या दोघांनी वडीलांसमोर ठेवला. फ़तेहचंदांनी झालेलं नुकसान बघता आता निर्मितीतून अंग काढून घायचं हे निश्चित केलं होतं. मात्र मुलांचं मन त्यांना मोडवलं नाही आणि अखेर त्यांनी चित्रपटात पैसा गुंतवायला होकार दिला. वडिलांनी होकार कळवला असला तरिही पुढचं सगळं अवघड होतं कारण चित्रपट नेमका कसा बनवतात हे त्यांना माहित नव्हतं. त्यांनी मग Filve Cs of Cinematography हे पुस्तक खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी थेट श्रीनगर गाठलं आणि एक हाऊसबोट भाड्यानं घेतली. पुढचे तीन महिने त्यांनी या हाऊसबोटीत स्वत:ला चक्क कोंडून घेत सिनामाचं स्वयंअध्ययन चालू केलं. पुढचे तीन महिने सर्व भावंडांनी मिळून हे पुस्तक अक्षरश: पाठ करत सिनेमा बनविण्याचं तंत्र शिकून घेतलं. मुंबईत परतल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या हॉरर पटाला सुरवात केली. या चित्रपटाचं नाव होतं, दो गज जमिन के नीचे. चित्रपट बनविण्याचा पैसा वाचवायचा म्हणून रियम लोकेशनवर शूट करण्याचं ठरविलं आणि युनिट महाबळेश्वरला गेलं. चर्चच्या पाद्रींची परवानगी घेत स्मशानात खड्डा उकरण्याचं काम चालू झालं. मात्र झालं असं की नीट पहाणी करून निवडलेल्या जागीही अचानक मृतदेह सापडला आणि जीर्ण सापळा नव्हे तर अलिकडेच मरण पावलेला मानवी देह. यामुळे स्थानिकांत असंतोष पसरला. युनिटला घेरण्यासाठी लोक जमू लागले आणि कसं बसं युनिट सहीसलामत बाहेर पडलं.  कसंबसं शूटींग पूर्ण झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुफ़ान चालला. त्यानंतर रामसे बंधूंनी मागे वळून पाहिलंच नाही. विशेष म्हणजे रामसेबंधू निर्मित असं म्हणताना शब्दश: सगळे रामसे बंधू निर्मितीत सहकार्य करत असत. कुमार रामसे स्क्रिप्ट लिहित, गंगू रामसे कॅमेरा सांभाळत, केशू रामसे प्रोडक्शन बघत, किरण साऊंड्चं बघत असत, तुलसी आणि श्याम दिग्दर्शन करत असत. अर्जून एडिटींगचं काम बघत असत.


#ramsebandhu #fogajzaminkeniche


Inmarathi पूर्वप्रकाशित 


No comments: