Wednesday, March 23, 2022

मीना कुमारी जेंव्हा खुनभरी स्वाक्षरी देते

 

 

अभिनेते, अभिनेत्र्या यांचं वेड आम सगळ्यांनाच असतं. आपापल्या लाडक्या कलाकाराच्या प्रेमात वेडे लोक त्यांच्यासारखं दिसण्या बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे फ़ोटो जमा करतात आणि अगदीच नशिबानं साथ दिली तर भेटून स्वाक्षरीही घेतात. मात्र कधी कधी या कलाकारांना आपल्या फ़ॅन्सचे असे काही अनुभव येतात की ते त्यांच्या आयुष्यभर लक्षत रहातात. सत्तरच्या दशकातील ट्रॅजिडी क्विन म्हणून लौकीक मिळविलेली अभिनेत्री मीना कुमारी. अत्यंत तरल असा अभिनय आणि शालीन सौंद्य अशी जिची ओळख होती ती मीना कुमारी लाखो दिलो की धडकन होती. तिची एक झलक मिळावी म्हणून तिचे चाहते तळमळत असत. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असे. मात्र एक अनुभव असा आला की त्यानं मीना कुमारीचा थरकाप उडाला. एका डाकू फ़ॅननं मीना कुमारीकदे अशी मागणी केली की मीना कुमारीच काय उपस्थित क्रु मेंबर्सनाही घाम फ़ुटला.

त्याचं झालं असं की, मीना कुमारी त्या काळात कमाल अमरोहींच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. त्यांच्याच पाकिजामधे कामही करत होती. पाकिजाच्या मेकिंगची चर्चा त्या काळात जोरदार होती. या चित्रपटाच्याच शुटिंगसाठी सगळं युनिट कुप्रसिध्द मध्य प्रदेशातील शिवपूरी भागात गेले होते. त्या काळात चंबळ मधील डाकूंनी नुसता धुमाकूळ घातला होता. अनेक क्रूर डाकू या भागात कार्यरत होते आणि त्यांच्या क्रुरतेच्या कहाण्यांनी वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरले जात होते. शहाणा माणूस या भागातून रात्रीचा प्रवासच काय पण दिवसाचा प्रवासही शक्यतो टाळत असे. या खोर्‍यात डाकूंच्या तावडीत सापडणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण बनलं होतं.

मीना कुमारी, कमाल अमरोही आणि काही क्रू मेंबर्सना शुटिंग संपवून मुंबईला परतताना रात्र झाली. कुप्रसिध्द चंबळच्या खोर्‍यातून जात असतान कधी एकदा या टापूतून बाहेर पडतोय असं प्रत्येकाला झालेलं होतं. मात्र नियतीनंच ती रात्र मीना कुमारीसाठी विचित्र रात्र म्हणून आधीच नोंदवून ठेवली होती. पुढे जे घडणार होतं ते भूतो न भविष्यती असं असणार होतं. दोन कारमधून ही मंडळी चाललेली असतानाच अचानक बियाबान भागात आल्यावर कारमधलं पेट्रोल संपलं आणि रस्त्याकडेला गाड्या थांबवल्या गेल्या. इतक्या रात्री पेट्रोल शोधायला जाणं म्हणजे डाकूंना आपणहोऊन आमंत्रण दिल्यासारखं होणार होतं. म्हणून कमालजींनी निर्णय घेतला की, गाड्या रस्त्याकडेला थांबवून मुंबईला जाण्याची काही सोय होतेय का बघायची. विचारविनिमय चाललेला असताना अचानकपणे डाकूंनी त्यांना घेरलं. कारमधल्या प्रत्येकाचं धाबं दणाणलं. आजूबाजूला बंदूकीचा निशाणा धरलेले डाकू आणि आता यातून सुटका नाही ही जाणीव झालेले कमालजी. खिडक्यांच्या काचा ठोठावत सगळ्यांना बाहेर येण्याविषयी सांगितलं जात होतं. कमालजिंनी धैर्य गोळा करत त्यापैकी एका डाकूला सांगितलं की तुझ्या सरदाराला मला येऊन भेटायला सांग. त्यांनी हे सांगताच याच घेरावातून एक सामान्य उंचीचा आणि रेशमी कुर्ता सलवार घातलेला एक इसम पुढे आला. त्यानं कमालजींना विचारलं,” तुम कौन हो?” कमालजींनी त्याला सांगितलं की,” मैं कलाम अमरोही हूं और मै चंबल शूटिंग करने आया हूं” शुटिंग हा शब्द ऐकताच तो इसम संतापला. तो कमालजींना पोलीस समजला आणि शूटिंग म्हणजेच डाकूंना मारायला हा पोलिसवाला आला आहे असा त्याचा समज झाल्यानं तो रागात बोलू लागला. कमालजींच्या लक्षात आलं की समोरच्या इसमाचा काही गैर्समज झालेला आहे. त्यांनी तातडीनं खुलासा केला की, शूटींग म्हणजे चित्रपटाचं शूटिंग. हे ऐकून तो इसम शांत झाला. कमालजींनी थोडं धाडस गोळा करत त्या इसमाला विचारलं की तुम्ही कोण आहात? यावर त्यानं जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांची भितीनं दातखिळ बसायची वेळ आली. या डाकूचं नाव होतं, डाकू अमृत लाल. त्या काळात अमृत लाल त्याच्या कारनाम्यांमुळे सतत बातम्यांत असायचा. त्याच्या क्रुरतेला सीमाच नव्हती. आता कमालजींकडे त्यानं अधिक चौकशी सुरू केली. कोणता चित्रपट, कलाकार कोण? मग त्याला कळलं की या चित्रपटात मीना कुमारी काम करत असून आत्ता या क्षणी ती तिथे उपस्थित आहे. झालं! तो इसम आनंदानं वेडा झाला कारण तो मीना कुमारीचा प्रचंड मोठा चाहता होता. त्यानं हट्टच धरला की त्याला मीना कुमारीला भेटायचं आहे. काही झालं तरी डाकूच तो, त्याला भेटायला मीना कुमारी राजी होईना. मात्र अमृत लालनं सांगितलं की, जर का त्याला मीना कुमारि भेटली तर तो सर्वांना पुढच्या प्रवासाला जाऊ देईल. अखेर क्रु मेंबर्सचा विचार करत मीना कुमारी या भेटीला तयार झाली. अमृत लाल आनंदानं अक्षरश: वेडा झाला. त्यानं या मंडळींच्या खानपानाची व्यवस्था केली आणि दरम्यान गाड्यांमधे पेट्रोल भरण्याची व्यवस्था केली. अमृतलालकडचा पहुणचार घेऊन मंडळी निरोप घेऊन निघाली. प्रत्येकाच्याच मनात सुटलो बुवा अशी भावना असतानाच अमृतलालचं डोकं पुन्हा फ़िरलं. आता त्याला मीना कुमारीची स्वाक्शरी हवी होती. ती द्यायला खरंतर मीना कुमारीची काहीच हरकत नव्हती पण डाकूला हवी असणारी स्वाक्षरी सामान्य कशी असेल? अमृतलालनं सुरीनं मीना कुमारीनं तिचं नाव स्वत:च्या हातानं अमृतलालच्या हातावर कोरावं अशी त्याची इच्छा होती. कधी कोणावर चढ्या आवाजातही न बोलणार्‍या मीना कुमारीला हे करणं म्हणझे साक्षात ब्रम्हांड आठवणारं होतं. तिनं नकार दिला मात्र डाकू हट्टालाच पेटलेला. अखेर मीना कुमारीनं कशीबशी हिंमत करुन हे कामही पार पाडलं आणि सगळ्या क्रु मेंबर्सची सुटका केली. स्वाक्षरी घेऊन अमृतलाल खुष झाला आणि क्रु मेंबर्स गाडीत बसून वेगात गाडी दामटवत मुंबईच्या दिशेने निघाले.


आजच्या पोस्टसाठी जो व्हिडिओ जोडलेला आहे तो मीनाकुमारी यांनी फ़ौजी भाईयों के लिए सादर केलेल्या जयमाला कार्यक्रमाचा आहे. मीना कुमारी यांचा आवाज यात ऐकायला मिळेल.

[लेख पूर्वप्रसिध्दी inmarathi]

#meenakumari#jaymala#oldhindisongs#dilekmandir



 

ओरिजिनल ड्रीमगर्ल- देविका राणी

 

 भारतीय चित्रपट रसिकांसाठी ड्रीम गर्ल म्हणलं की हेमा मालिनी हे समिकरण आज जरी रुळलं असलं तरिही या किताबाची पहिली मानकरी आहे देविका राणी. सौंदर्य आणि अभिनय यांचा अनोखा मिलाप म्हणजे देविका राणी होत्या. आज अनेकांना देविका राणी हे नाव माहितही नाही मात्र एकेकाळी चित्रपट सृष्टीवर राज्य केलेली ही अभिनेत्री त्याकाळातली अत्यंत बोल्ड ॲण्ड ब्युटीफ़ूल अभिनेत्री म्हणून ओळखली जात असे.

देविका राणी यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी विशाखापट्टण येथे झाल्या.  गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांची त्या नात होत. देविकाचे वडील कर्नल एम एन चौधरी हे मद्रासचे पहिले सर्जन जनरल होते. लहानपणापासूनच देविका अत्यंत मोकळ्या वातावरणात वाढली. त्यांनी लंडनमधून थिएटरचे शिक्षण घेतले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिला तिच्या अभिनयासाठी कौतुक लाभलं. दहा वर्षांची कारकीर्द असणार्‍या देविकानं अवघ्या पंधरा चित्रपटांत भूमिका साकारल्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या चित्रपटात भूमिका साकारुनही हिंदी चित्रपट इतिहासात अजरामर झालेलं नाव म्हणजे, देविका राणी.

देविका राणी यांनी १९३३ साली कर्मा या चित्रपटातून पदार्पण केलं. हा पहिलाच इंग्रजी भाषेतील चित्रपट मानला जातो जो भारतीयानं बनविला होता आणि या आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी तब्बल चार मिनिटं लांबीचं चुंबन दृष्य दिलं. ज्या काळात स्त्रिया पडदा पध्दतीतून बाहेर आल्या नव्हत्या, पतीचा हातही चारचौघात धरणं जिथे शिष्टाचाराला धरून मानलं जात नव्हतं तिथे देविका राणीनं चुंबदृश्य देऊन खळबळ माजवली. यापूर्वी अशा प्रकारे चुंबनदृश्य चित्रीत केलं नव्हतं. अपवाद मूकपट  सीता देवी आणि चारू रॉय यांच्यावर चित्रीत झालेल्या मूकपटातील चुंबनदृश्य. मात्र या चुंबनाची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा देविका राणी आणि हिमांशु रॉय यांच्या पडद्यावरील चार मिनिटं लांबीच्या चुंबनमुळे झाली. भारतीय चित्रपट इतिहासातील हे आजवरचे सर्वात दीर्घ चुंबनदृष्य मानले जाते. मात्र वास्तविक पहाता पडद्यावर हा प्रसंग जसा घडतो ते पहाता हे रुढार्थानं चुंबन नव्हते. या चित्रपटातील हिमांशु जे पात्र साकारत होते त्या पात्राला साप चावला असता त्याला शुध्दीवर आणण्यासाठी देविका राणींचं पात्र चुंबनांचा वर्षाव करतं. हे करत असतानाच ओठांचं चुंबनही घेतलं जातं. हे दृश्य त्या काळात पडद्यावर बघून प्रेक्षकांचे श्र्वास थांबले होते. या दृश्यावर टिकाही भरपूर झाली कारण त्या काळात खुलेआम अशा प्रकारचा प्रणय दाखविणं समाजमान्य नव्हतं.

देविका राणींच्या खात्यात आणखिन एका गोष्टीचं श्रेय जातं आणि ते म्हणजे त्यांनी भारतीय चित्रपसृष्ट्रीचा ट्रॅजेडी किंग, दिलिप कुमार अर्थात युसुफ़ खान शोधला आणि या हिर्‍याला कोंदणात बंदिस्त केलं. दिलिप कुमारना चित्रपटात आणण्याचं श्रेय देविका राणींना जातं. युसुफ़ खानचा दिलिप कुमारही देविका राणीनीच केला.

१९२८ साली देविका आणि हिमांशू यांची भेट झाली आणि त्याच वर्षी त्यांचा विवाहही झाला. यानंतर या जोडप्यानं बॉम्बे टॉकिज नावाच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करुन अनेक गुणी कलाकारांना प्रेक्षकांसमोर आणलं. बोल्डॲण्ड ब्युटीफ़ूल या उक्तीला जर मानवी चेहरा दिला तर तो देविका राणी असे. आपल्या कारकीर्दीत आणि नंतरही निर्माती म्हणून देविका राणींनी खबळळ उडवून दिली होती.

[लेख पूर्वप्रसिध्दी inmarathi]

#devikarani#dreamgirl#achutkanya#janmbhoomi#blackwhitecinema#saraswatidevi#ashokkumar#oldsongs

  




Sunday, August 1, 2021

चौदा फेरे

 


याचे प्रोमोज बघून कधी एकदा रिलीज होतोय असं झालेलं. राॅमकाॅम हा आवडता प्रकार आणि फिलगूड जाॅनर् असल्यानं चौदा फेरेची उत्सुकता होतीच.
मात्र, विक्रांत आणि कीर्ती अशी वेगळी कास्टिंग असणारा चौदा फेरे जमता जमता राहिलेली दम बिर्याणी आहे. फसलेली म्हणणार नाही. कारण अगदीच फसलेली नाही, फक्त अतिप्रचंड predictable गोष्ट अतिप्रचंड predictable पात्रं आणि एकूण प्रवासही predictable. इतका की इथे स्पाॅयलर्स अलर्टही द्यायला नको.
दोन भिन्न जातीतले नायक नायिका कुटुंबातल्या कट्टरतेला बघता फेक आईवडील उभे करून लग्नाला उभे रहातात या गोष्टीत जे जे काही घडू शकतं ते ते पडद्यावर घडत रहातं.
मुळात ट्रेलरमधे दाखवल्याप्रमाणे हे दोघे एकदा नायकाच्या गावाला आणि एकदा नायिकेच्या गावाला जाऊन लग्न करतात. यात एक आईवडिलांची खोटी जोडी उभी करतात. जी नायिकेच्या कुटुंबाला नायकाचे आईवडिल म्हणून भेटतात तर नायकाच्या कुटुंबात नायिकेचे आईवडिल म्हणून भेटतात. आणि नेमकं हेच कारण आपल्याला सिनेमा बघण्यासाठी एक्साईट करतं. खरंतर या प्लाॅटमधे कहर घडामोडी घडू शकतात. पण सिनेमात त्या घडतच नाहीत आणि आपण अपेक्षाभंग घेऊन बसतो.

प्रियदर्शन सारख्यानं या प्लाॅटवर हास्याची इमारत उभी केली असती. इथे मात्र प्रचंड पोटेन्शियल असणारी स्क्रिप्ट घासून गुळगुळीत ट्रॅकवर घसरत जाते.

तुम्हाला 2004 ला प्रदर्शित झालेला प्रियदर्शन चा हलचल आठवतोय? त्यात जसा सगळा गैरसमजांचा , नात्यांचा गुंता होत जातो तसं काहीतरी चौदा फेर्‍यात होईल असं वाटत असताना गोष्ट फारशी गडबड गोंधळ न करता क्लायमॅक्स कडे जाते.

याचं कास्टिंग मस्त आहे. सगळ्यानी जीजानसे काम केलेलं आहे. गौहर खानला जास्त भावखाऊ भूमिका मिळालेली आहे आणि तिनं चीज केलं आहे. बाकी विक्रांत च्या जागी एका पाॅईंटनंतर आयुषमान असता तर? वाटत रहातं.
या सिनेमाला मी बनता बनता राहिलेली बिर्याणी म्हणण्याचं कारण हेच आहे. सगळे घटक अचूक प्रमाणात जमवलेले आहेत. मात्र खाताना जाणवतं, अरेच्चा यात मीठच नाही, भातही कच्चट शिजलाय. मग इतकावेळ पसरलेला सुगंध धत्त तेरी फिलिंग देतो.

जस्ट टाईमपास हवा असेल आणि थोडं सहन करायची तयारी असेल, विक्रांत चे फॅन असाल तर एकदा बघण्याइतपत आहे.

त.टी. - 1- हा सिनेमा संपल्यावर लगेचच आटोप्ले मोडवर ऑलटाईम फेवरेट सोचा नं था लागला. या रिव्ह्यूवर सोचा न था च्या मूडचा परिणाम असण्याची शक्यता गृहीत धरा आणि नाही आवडले चौदा फेरे तर मला दोष देऊ नका😉

#14Phere
#vikratmassy#kirtikharbanda



Thursday, July 1, 2021

 


लग्नामधे गाणी गाणारे वडील आणि त्यांची दोन मुलं. पैकी एकानं पाॅपसंगीत क्षेत्रात नाव  कमावलेलं आहे. तो अगदी हार्टथ्रोब वगैरे तर दुसरा तितकसं यश मिळवू न शकलेला आणि स्वतःचा बॅण्ड असलेला. या दोघांत भावंडातलं प्रेम वगैरे नाही असेलच तर कटुताच आहे. पण, वडिलांच्या मृत्यूमुळे अंत्यसंस्कारासाठी दोघांना एकत्र यावं लागतं. वडिलांची अंतीम इच्छा म्हणून एका लग्नात गाण्याच्या कार्यक्रमासाठी वडिलांच्याच जुन्या ऑलमोस्ट खटारा गाडीतून ते प्रवासाला निघतात.

त्या प्रवासाची गोष्ट म्हणजे कार्देशिम बेनीम (माय ब्रदर). 

कारा सेवदा नंतर आलेला बुराक ओझ्तीवितचा सिनेमा.  तुर्कीश आणि मराठीमधे हे साम्य आहे. यांची सिरियल इंडस्ट्री सिनेमापेक्षा जास्त प्रभावी आहे. इकडचे तिकडं म्हणजे सिरियलमधलेच सिनेमातही दिसण्याचं प्रमाण जास्त. बुराकनं कारा सेवदामधे भारी काम केलं होतं म्हणून याच्या सिनेमाची उत्सुकता होती. कार्देशिम बेनीम, 2016 ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्यांच्याकडच्या सिरियलच्या एका एपिसोडचा जीव असलेला छोटा सिनेमा आहे. 

मात्र याची कथा मस्त आहे. रोड जर्नी जाॅनर मधे प्रवासाचं कारण तगडं लागतं ते इथे एका बापाची अंतीम इच्छा हे आहे. या विचित्र बापानं विचित्र पध्दतीनं मुलांसमोर सादर केलेलं मृत्युपत्र आहे. हा भाग मला सगळ्यात जास्त आवडला.

दोघा भावंडांचा प्रवास जसजसा पुढे सरकतो तसं या मृत्यूपत्राचं कारण लक्षात येऊ लागतं. प्रवासाच्या शेवटी जो धक्का आहे तो अनपेक्षित असाच आहे. फक्त

ओढूनताणून प्रेमकथेचा ट्रॅक नसता तरी काही बिघडलं नसतं असं वाटतं. 

यांचे सिनेमेच मुळात छोटेखानी असतात तसाच हाही आहे. लाॅकडाऊन मधे थोडावेळ बरा जावा वाटत असेल आणि अत्युच्च अपेक्षा नसतील तर हा सिनेमा चांगला आहे. माझा स्वतःचा हा अत्यंत लाडका जाॅनर् आहे त्यामुळे मी याप्रकारचे सिनेमे जे समोर येतील ते बघू शकते. इथे तर बुराकचं तगडं कारण होतं.

#loveforturkushmovies

#kardesimbeni.

#burak

Friday, May 7, 2021

हिंदी गाण्यांवर आकाशवाणीची बंदी

 

हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काळातच ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपट संगीत प्रसारीत करण्यावर बंदी होती. ही बंदी थोडी थोडकी नाही तर तब्बल दहा वर्षं चालली. या बंदीचा फ़ायदा करून घेत रेडिओ सिलोननं एक अनोखा कार्यक्रम श्रोत्यांसाठी आणला ज्यानं रेडिओ जगतात इतिहास रचला.



तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की जो कालखंड हिंदी चित्रपटांचा, हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हणून नोंदवला गेला आहे त्याच काळात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपट संगीतावर चक्क बंदी घातली होती आणि या बंदीमागचं कारणही तितकंच धक्कादायक होतं. हिंदी चित्रपट संगीतातील गाण्याचे शब्द अश्लिल असतात, पाश्चिमात्य संगीत, वाद्यं या गाण्यात वापरली जातात आणि हे भारतीय अभिजात संगीतासाच्या भविष्यासाठी धोक्याचं असल्याचं कारण या बंदीमागे दिलं गेलं.

त्यावेळचे माहिती आणि प्रसारण मंत्री बी. व्ही. केसकर यांनी हि बंदी घातली होती. मात्र पूर्ण बंदी आधी कोटा पध्दत चालू करण्यात आली. या पध्दतीनुसार कोणती गाणी प्रसारीत करायची याची आधी चाळणी लावलि जायची आणि यातून पार होणारी गाणिच वाजवली जात.  प्रोड्युसर्स गिल्डनं याचा विरोध केला. अखेर केसकरना जे हवं होतं ते आपसूक घडलं कारण वैतागलेल्या निर्मात्यांनी आकाशवाणीला गाणी देणं बंद केलं. अखेर ऑल इंडिया रेडिओवरून हिंदी चित्रपट संगीत गायब झालं.

आकाशवाणीचा मार्ग बंद झालेला असला तरिही दुसरा मार्ग खुला झाला होता. रेडिओ सिलोन हे त्या काळातल्या सिलोन अर्थात श्रीलंकेतलं रेडिओ स्टेशन होतं. सिलोननं ही संधी हेरली आणि हिंदी चित्रपट संगीतासाठी आपली दारं मोकळी केली. आता श्रोते सिलोनवर रमू लागले. याच काळात सिलोननं एक अभिनव कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला. हिंदी गाण्यांच्या काऊंटडाऊनचा हा कार्यक्रम मूळ इंग्लिश कार्यक्रमाची हिंदी आवृत्ती होती. अमिन सायानी या स्टार अनाउन्सरचा उदय या कार्यक्रमामुळे झाला. (याच अमिन सायानीनी अमिताभला आकाशवाणीच्या नोकरीच्या इंटरवह्यु मधे रेडिओसाठी आवाज योग्य नाही हे कारण सांगून रिजेक्ट केलं होतं). बिनाका गीतमाला हे त्या कार्यक्रमाचं नाव. सर्व लेटेस्ट चित्रपटातीलग णी लोकप्रियतेच्या क्रमवारीनुसार या कार्यक्रमात वाजवली जात. पुढे अनेक वर्ष हा कार्यक्रम चालला. सर्वात जास्त प्रसारण झालेला असा हा कार्यक्रम आहे. पायदान, बहेनो और भाईयो हे शब्द अमिन सायानींच्या आवाजात आयकॉनिक बनले. हा कार्यक्रम बनविणं मात्र खूप कठीण होतं कारण अगदी प्रामाणिकपणे संशोधन करत हा कार्यक्रम बनविला जात असे. अगदी लेटेस्ट क्रमवारी मिळावी म्हणून खूप आधी कार्यक्रम रेकॉर्ड केला जायचा नाही. याची विश्वासार्हता इतकी होती की एखादं गाणं टॉपला आहे याचाच अर्थ ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे हे लोकांनाही मान्य असायचं. पहिल्या गाण्यासाथी बिगूल वाजवला जायचा. बिनाला गीतमाला क्रमवारीत पहिल्या तिनात येणं फ़ार प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. रामायण आणी महाभारताच्या काळात ज्याप्रमाणे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नसे त्याचप्रमाणे दर बुधवारी रात्री आठ वाजता लोक जिथल्या तिथे थांबत असत कारण त्यांना गीतमालाचा भाग चुकवायचा नसे.

 हा कार्यक्रम अक्षरश: लोकांनी डोक्यावर उचलुन धरला. या कार्यक्रमाच्या ऑडिओ कॅसेटसी निघाल्या. आजही सारेगम कारवावर गीतमालाचे एपिसोड उपलब्ध आहेत. यथावकाश ऑल इंडिया रेडिओनं ही बंदी उठवली आणि हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करायला सुरवात केली तरिही हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय राहिला. १९८९ पर्यंत सिलोनवरच हा कार्यक्रम प्रसारीत केला जात असे त्यानंतर मात्र तो आकाशवाणीनं घेतला. बिनाका गीतमालामुळे आकाशवाणीला एखाद्या कार्यक्रमाचं व्यावसायिक मूल्य काय असतं हे लक्षात आलं. उत्पन्नाचा मार्ग जाहिरातींमुळे सोपा होतो हे या कार्यक्रमामुळे कळलं. केसकर यांच्या भूमिकेला विरोध करनारे जसे होते तसेच त्याचं समर्थन करणारेही होते.

या बाबतीतला एक किस्सा असा सांगितला जातो की, १९५१ साली आलेल्या बाजी या चित्रपटात गीता दत्तच्या आवाजातलं तदबीर असे बिगदी हुई हे गाणंही केसकराम्नी नाकारलं होतं. याचं कारण हे गाणं मूळ एक गझल होती आणि सचिनदानी गिटारचा वापर करून त्या गझलला पाश्चिमात्य रूप दिलं होतं. केसकर हे पाश्चिमात्य वाद्यांचे कट्टर विरोध्क मानले जात. त्याऐवजी गाण्यात बासरी, तबला अशी भारतीय वाद्यं वापरावीत असा त्यांचा आग्रह होता. सुरवातीला सिलोनवरून प्रसारीत होणार्‍या हिंदी गाण्यांकडे कोणी फ़ारसं लक्ष दिलं नाही मात्र जसजशी सिलोनची लोकप्रियता भारतात वाढू लागली आणि ती वाढतच चालली तसे डोळे उघडणं भाग होतं आणि केसकरांवर ही बंदी उठवण्यासाठी दबाव येऊ लागला. अखेरीस केकर यांना नमतं घेत ही बंदी उठवावी लागली.


Inmarathi पूर्वप्रकाशित 


#binakageetmala #AIR # aminsayani


शाहरुखच्या घरात माधुरी अनिलचा नाच

 

मन्नत, बस नाम ही काफ़ी है. असा हा मुंबईतला पत्ता. या पत्त्यावर रहातो बॉलिवुडचा बादशहा, शाहरुख. याच मन्नत बंगल्यात अनिल कपूर आणि माधुरी एक दो तीन या लोकप्रिय गाण्यावर थिरकले होते. काय होता नेमका हा किस्सा?-




एन चंद्रानं तेजाब बॉलिवुड प्रेमींच्या बकेट लिस्टमधली गोष्ट असते, मुंबईतल्या मन्नतला भेट देणं. हा मन्नत बंगला आज शाहरूखचा म्हणून ओळखला जात असला तरिही या बंगल्याचिही सुरस कथा आहे. या बंगल्याचा मूळ मालक गुजराती पारसी होता. खानदानी घर असणार्‍या गांधी कुटुंबातल्या किकी गांधीकडे याची मालकी होती आणि याचं नाव होतं,” व्हिला व्हिएन्ना”. अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत हा बंगला याच नावानं ओळखला जात असे. किकूला अपत्य नसल्यानं त्यानं पुढे हा बंगला त्याची बहिण गुलबानोचा मुलगा नरिमन याच्या नावावर केला. गंमत म्हणजे नरिमनचा मुलगा आयरिश आणि शाहरूखचा मुलगा आर्यन हे खूप चांगले मित्र आहेत. शाहरूख नरिमनचा शेजारी होता. शाहरूखनं पहिल्यांदा हे घर पाहिलं तेंव्हाच त्याला ते खूप आवडलं आणि जर शक्य असेल तर हेच घर विकत घ्यायचं त्यानं ठरवलं. ते घर भाड्यानं देण्याचा निर्णय घेतल्याचं कानावर आल्यावर शाहरूखनं त्याला तो बंगला विकत घेण्याचा प्रस्ताव दिला. १९९५ मधे बरेच प्रयत्न केल्यानंतर शाहरूखनं अखेर नरिमनला हे घर विकण्यासाठी राजी केलं. त्याकाळात शाहरूखनं हा बंगला घेण्यासाठी १५ कोटी रुपये मोजले होते. अजच्या घडीला या बंगल्याची किंमत दोनशे कोटींहून जास्त आहे. या घराला आधी त्यानं जे आहे तेच नाव ठेवलं होतं मात्र इथे रहायला आल्यावर हे घर त्याच्यासाठी फ़ारच लकी ठरलं आणि त्यानम या घराचं नाव बदलून मन्नत ठेवलं. या बंगल्याची बांधणी ही विसाव्या शतकातली असून वर्ल्ड हेरीटेजच्या ग्रेड थ्री मधली आहे. सर्व बाजूंनी मोकळा असा हा बंगला, आकाश, वारा आणि समुद्राचं दर्शन यानी समृध्द आहे.

मात्र मन्नत शाहरूखचा होण्यापूर्वी तो व्हिला व्हिएन्ना होता आणि तो हिंदी चित्रपटांना शुटिंगसाठी भाड्यानं दिला जात असे. अनेक चित्रपटांचं शूटींग या बंगल्यात झालेलं आहे. मात्र १९८८ मधे एका  चित्रपटानं धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचं नाव होतं, तेजाब. एन रामचंद्राचा हा सिनेमा त्या काळचा नंबर वन स्टार अनिल कपूर आणि अनेक चित्रपटात सहय्यक भूमिका करूनही हवं ते यश न मिळालेली माधुरी दीक्षित यांना घेऊन बनवला होता. चित्रपतात माधुरी एक क्लब डान्सर असते त्यामुळे एक डान्स नंबर या चित्रपटात घेतला होता ज्यानं चित्रपट प्रदर्शित झाल्यावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यानं माधुरीला रातोरात स्टार शर्यतीत आणून बसवलं. हे गाणं होतं, एक दो तीन. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर याचा गाण्याचं मेल व्हर्जनही चित्रपतात घेण्याचं ठरलं. मग या गाण्यासाठी लोकेशनचा विचार सुरू झाला आणि चित्रपटात व्हिला व्हिएन्ना कथेत आला असल्यानं हेच लोकेशन घेण्याचं ठरलं त्यानुसार एक दो तीन च्या मेल व्हर्जनचं शुटिंग या बंगल्यात पार पडलं.  आज हा व्हिला व्हिएन्ना शाहरूखचा मन्नत पत्ता असल्यानं सामान्यांना केवळ गेटचं दर्शन घेणं शक्य आहे मात्र नव्वदच्या दशकाच्या आधिच्या  चित्रपटांनी आपल्याला पडद्यावर मन्नतचं दर्शन शक्य करून ठेवलं आहे. अर्थात व्हिला व्हिएन्नाला मन्नत बनवायला गौरी खाननं चार वर्षं आणि तेरा कोटी रुपये खर्च केले आहेत  पण मन्नतच्या मूळ रुपाची झलक सिनेमातून का होईना नक्कीच बघता येईल.


Inmarathi पूर्वप्रकाशित 


#madhuridixit #anilkapoor #tezab #mannat







फ़ाळणीनंतर भारतात परतलेल्या भावंडांनी देशाला घाबरवलं

 



 

भारत –पाकिस्तान फ़ाळणी नंतर भारतात आलेलं एक कुटुंब. डोक्यावर कर्जाचा बोजा असलेल्या या कुटुंबातल्या भावंडानी नंतर सिनेमा क्षेत्रात खळबळ माजवून टाकली. ही भावंडं म्हणजेच रामसे बंधू. भारतीय भयपट म्हणलं की पहिलं नाव डोळ्या समोर येतं ते रामसे बंधूंचंच. अशा या भावंडाची ही गोष्ट-

 

स्वातंत्र्यपूर्व काळात रामसे ब्रदर्सचे वडील फ़तेहचंद रामसिंघानी यांचं पाकिस्तानातल्या कराचीमधे वीजसाहित्य विक्रीचं दुकान होतं. कुटुंब कबिला मोठा होता आणि दुकान ठीक चाललं होतं. त्याकाळात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि रामसिंघानींच्या दुकानात बहुतेक गिर्‍हाईक ब्रिटीश असत. मात्र अडचण ही होती की दुकानावर लावलेल्या पाटीवरचं नाव ब्रिटीशांना नीट वाचता येत नसे. रामसिंघानी इतकं मोठं नाव वाचताना इंग्रजी गिर्‍हाईकांना त्रास व्हायचा. हे लोक फ़तेहचंदांना रामसे सदृष काहीतरी हाक मारायचे. फ़तेहचंदांनी विचार केला की आपल्या ग्राहकांना जे सोयीचं पडत आहे ते नाव धारण करावं जेणेकरुण त्यांना नाव उच्चारताना त्रास होणार नाही. फ़तेहचंदांनी नविन बोर्ड बनवून त्यावरचं रामसिंघानी नाव बदलून रामसे लिहिलं. आता गिर्‍हाईकही खुष झालं. दुकान चांगलं चालायला लागलं होतं मात्र ही परिस्थिती फ़ारकाळ टिकली नाही. १९४७ ला देशाची फ़ाळणी होऊन धर्मावर आधारीत दोन देश बनले. फ़तेहचंद रामसे आपला कुटुंब कबिला घेऊन भारतात मुंबईत आले.

मुंबईत आल्यावरही फ़तेहचंदांनी आपला जुनाच व्यवसाय नव्यानं चालू केला. मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवरील अप्सरा सिनेमाच्या समोर त्यांनी वीज साहित्याचं दुकान थाटलं. नविन दुकान, नविन शहर असलं तरिही त्यांनी नाव मात्र रामसेच ठेवलं. ते बदललं नाही. रामसिंघानी आता कायमचेच रामसे झाले होते. त्याकाळातला सुप्रसिध्द मर्फ़ी रेडिओ फ़तेहचंदांच्या दुकानाता प्रामुख्यानं विक्रिला होता. नविन शहर, गिर्‍हाईकांची मानसिकता नवी. धंद्याचा सूर काही ठीक लागत नव्हता. अशातच फ़तेहचंदांचं लक्ष नव्यानंच बहराला येऊ पहात असणार्‍या एका क्षेत्राकडे गेलं. हे क्षेत्र होतं सिनेमा निर्मितीचं. फ़तेहचंदांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरायचं ठरवलं. १९५४ साली आलेला शहीद-ए-आजम भगत सिंह हा निर्माता म्हणून फ़तेहचंदांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट फ़ारसा चालला नाही. यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर आणि सुरैय्या यांना मुख्य भुमिकांत घेऊन रुस्तुम सोहराब (१९६३) बनविला जो सुपरहिट ठरला. फ़तेहचंदांच्या नावावर एक फ़्लॉप एक हिट होता अशातच त्यांनी तिसर्‍या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली. एक नन्ही मुन्नी सी लडकी हा त्यांचा पुढचा चित्रपट अत्यंत वाईट पध्दतीनं फ़्लॉप झाला. हे अपयश इतकं जोरदार होतं की फ़तेहचंदांनी चित्रपटसृष्टीचा नाद सोडण्याचं आणि चित्रपट निर्मिती न करण्याचं ठरविलं.

त्यांनी हा निर्णय घेतला असला तरिही नियतीनं वेगळाच डाव त्यांच्यासमोर मांडलेला होता लवारच रामसे हे नाव भारतीय भयपटांचं जनक बनणार होतं आणि हे घडायला कारण ठरला फ़्लॉप चित्रपटातला एक सिन.

त्याचं झालं असं की फ़तेहचंदांची मुलं, श्याम आणि तुलसी चित्रपटगृहात चित्रपट झळकला की प्रेक्षकांत बसून तो बघत असत. जेणेकरून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समजाव्यात. एक नन्ही मुन्नी सी लडकी बघायलाही हे दोघे भाऊ चित्रपटगृहात गेले. त्यांना तो सिनेमा बघताना लक्षात आलं की एक विशिष्ट सीन चालू असताना प्रेक्षक कमालिचे उत्कंठीत झाले होते. या सिनमधे एक चोरी घडते ज्यात पृथ्वीराज  कपूर भारी भक्कम पोषाख घालून, मास्क लावून आणि उंच बूट घालून म्युझियममधे चोरी करायला जातात. तुलसी रामसेंनी निरिक्षण केलं की या सिनमधे पृथ्वीराज एखाद्या सैतानासारखे भासत होते आणि पोलिसांनी मारलेल्या गोळ्याही त्यांना काहीही इजा न करता बाजूला पडत होत्या हे बघून प्रेक्षक हैराण झाले होते. पडद्यावर हे सिन बघताना थिएटरमधे टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या. लोकांना काय बघायला आवडतं हे रामसे बंधूंना समजलं होतं.

चित्रपट पाहून परत आल्यावर या दोघांनी वडिलांशी चर्चा केली. आपण हॉरर चित्रपट बनवुया असा प्रस्ताव या दोघांनी वडीलांसमोर ठेवला. फ़तेहचंदांनी झालेलं नुकसान बघता आता निर्मितीतून अंग काढून घायचं हे निश्चित केलं होतं. मात्र मुलांचं मन त्यांना मोडवलं नाही आणि अखेर त्यांनी चित्रपटात पैसा गुंतवायला होकार दिला. वडिलांनी होकार कळवला असला तरिही पुढचं सगळं अवघड होतं कारण चित्रपट नेमका कसा बनवतात हे त्यांना माहित नव्हतं. त्यांनी मग Filve Cs of Cinematography हे पुस्तक खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी थेट श्रीनगर गाठलं आणि एक हाऊसबोट भाड्यानं घेतली. पुढचे तीन महिने त्यांनी या हाऊसबोटीत स्वत:ला चक्क कोंडून घेत सिनामाचं स्वयंअध्ययन चालू केलं. पुढचे तीन महिने सर्व भावंडांनी मिळून हे पुस्तक अक्षरश: पाठ करत सिनेमा बनविण्याचं तंत्र शिकून घेतलं. मुंबईत परतल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या हॉरर पटाला सुरवात केली. या चित्रपटाचं नाव होतं, दो गज जमिन के नीचे. चित्रपट बनविण्याचा पैसा वाचवायचा म्हणून रियम लोकेशनवर शूट करण्याचं ठरविलं आणि युनिट महाबळेश्वरला गेलं. चर्चच्या पाद्रींची परवानगी घेत स्मशानात खड्डा उकरण्याचं काम चालू झालं. मात्र झालं असं की नीट पहाणी करून निवडलेल्या जागीही अचानक मृतदेह सापडला आणि जीर्ण सापळा नव्हे तर अलिकडेच मरण पावलेला मानवी देह. यामुळे स्थानिकांत असंतोष पसरला. युनिटला घेरण्यासाठी लोक जमू लागले आणि कसं बसं युनिट सहीसलामत बाहेर पडलं.  कसंबसं शूटींग पूर्ण झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुफ़ान चालला. त्यानंतर रामसे बंधूंनी मागे वळून पाहिलंच नाही. विशेष म्हणजे रामसेबंधू निर्मित असं म्हणताना शब्दश: सगळे रामसे बंधू निर्मितीत सहकार्य करत असत. कुमार रामसे स्क्रिप्ट लिहित, गंगू रामसे कॅमेरा सांभाळत, केशू रामसे प्रोडक्शन बघत, किरण साऊंड्चं बघत असत, तुलसी आणि श्याम दिग्दर्शन करत असत. अर्जून एडिटींगचं काम बघत असत.


#ramsebandhu #fogajzaminkeniche


Inmarathi पूर्वप्रकाशित 


त्रिभंग

 

#Tribhang #त्रिभंग 




एक छानशी कादंबरी वाचावी असा अनुभव हा सिनेमा देतो या वाक्यानं सुरवात झालेल्या रिव्ह्यूत चित्रपटपटाचं कौतुकच असणार हे ओघानंच आलं. 

मुळात मी रिव्ह्यू लिहीणार नाहीए. कारण सिनेमा बघितल्यावर बरंच काही विचार करायला लावतो हा सिनेमा. रूटिन रिव्ह्यू पलीकडचं खूप काही लिहावसं वाटतं हा चित्रपट बघून. हे या चित्रपटाचं नव्हे तर कथेचं यश आहे. चित्रपटाचं नव्हे या वाक्याचा अर्थ कथा उत्तम आणि सादरीकरण माती असा अजिबात नाही. मात्र सिनेमा हेही सिनेमॅटिक भाषेतली गोष्ट सांगणंच असतं. गोष्ट हा आत्मा असेल तर या सिनेमाचा आत्मा प्रेमात पडावा असा आहे. 

ही गोष्ट सिनेमा म्हणून पडद्यावर आणताना कसरत होती कारण अनेक जागा होत्या जिथे कथा पटकन सुटून भरकटण्याची पूर्ण शक्यता होती. सिनेमात दिग्दर्शक दिसतो तसा या सिनेमात "लेखक" दिसतो. एका लेखिकेची गोष्ट साकारली जाताना ही गोष्ट जिने लिहिली ती दिसत रहाते. सतत .आणि हे दिसणं खूप छान आहे. (म्हणूनच पोस्टला रेणुका असलेलं पोस्टर आवर्जून निवडलेलं आहे) हा सिनेमा बघताना दुपारच्या वेळेत वाचल्या जाणाऱ्या कादंबरीचा फील येतो. आता हा सिनेमा अनेकांना अजिबात का आवडला नाही याचं कारणही कळायला हरकत नाही. मुळात हा gener जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला हा सिनेमा आवडणारच नाही हे अगदी नक्की. 

दुसरा आक्षेप, काजोलची लाऊड अॅक्टिंग. ती लाऊड आहे का? तर हो. तिचं पात्राशी एकरूप होणं कमी पडलंय का? तर हो. ती कथेत फिट नाही का? याचं उत्तर जरा संदिग्ध आहे. म्हणजे तुम्ही जर तब्बूचे फॅन असाल तर सतत वाटत रहातं यार, ही भूमिका तब्बूसाठीच लिहिली आहे. इतकी ती अनुच्या कॅरेक्टरमधे  दिसते. विशेषतः जो हायपाॅईंट आहे, जिथे अनुला नयनचा पश्चाताप कळतो त्या सिनमधे तर फार फार वाटतं की तब्बूनं हा सिन फार उच्च लेव्हलवर केला असता.  तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय? (विचित्र उदाहरण आहे, त्याबद्दल साॅरी. पण दुसरं चपखल आठवलं नाही) की चपलेला खिळा असतो तो सुरवातीला टोचून हैराण करतो नंतर नंतर त्याची सवय होते आणि काही वाटेनासं होतं. किंवा ड्रेसला जो प्राईस टॅग असतो त्याची ती नायलाॅनची दोरी चुकून रहाते मग मानेवर टोचत रहाते, अनईझी होत रहातं थोडावेळ पण मग दूर्लक्ष करता येतं ते टोचणं. तसं काहिसं झालंय हे अनु चं कास्टिंग. पण पूर्ण फसलेलं अगदी नक्की नाही. काजोलनं पूर्ण प्रयत्नानी पेलवलं आहे. फक्त तिच्यावरची दिग्दर्शकाचीच पकड मधेच ढिली झालेली जाणवते पण तितकंच. मात्र हे सगळं कुठेही रसभंग करत नाही कारण बाकी सगळं कास्टिंग इतकं पर्फेक्ट आहे की क्या केहेने! 

मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही की, सिनेमाची कथा मराठी कुटुंबात घडते आणि "ओघात" मराठी संवाद येतात. हे ओघात येणं फार छान  जमलंय. इंग्लिश-हिंदी-मराठीची भेळ न होता ते ओघवतं वाटतंय आणि हे लिहिणं अजिबात सोपं नाहिए.

कथानक अजिबातच सांगणार नाही याचं कारण स्पाॅयलर्स नसून काही गोष्टी या सांगण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त मजा असते. मात्र यातल्या व्यक्तीरेखांविषयी उल्लेख करण्याचा मोह टाळता येत नाही. 

मनस्वी असणं हे कितिही पोएटिक वाटत असलं तरिही त्याची किंमत मनस्वी व्यक्तीशिवाय बरेचण चुकवतात. खासकरून अगदी जवळची माणसं. हे त्या व्यक्तीच्या गावीही नसतं बहुतेकदा. 

आपण आपले निर्णय फार बोल्डपणे घेतले असं मानणारे  त्याचा परिणाम इतरांवर होऊ शकतो हे सोयिस्कर विसरतात. ज्यांचा या मनस्वीपणाशी संबंध नसतो ना या बोल्डनेसशी ती जवळची माणसं मात्र नाहक भरडली जातात.

त्रिभंग हे भरडलं जाणं फार अलवारपणे दाखवतो.


याचा क्लायमॅक्सही खूप हुशार फ्रेम्समधून केला आहे. मला कोणत्याही उणिवांशिवाय हा सिनेमा आवडलाय. 

महत्वाचं, वयवर्षं 17 सोबत बघितला आहे. शिव्या, सिगरेट,  दारू हे काहीही आड येत नाही. (तसंही फक ही अलिकडे शिवी राहिली नाहीए)  बिलिव्ह मी. कारण सिनेमा गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम पर्फेक्ट करतो.


तुम्ही अगदीच पिटातले प्रेक्षक असाल तर नाद सोडा पण चांगली गोष्ट बघायला आवडत असेल तर नक्की बघा. एकदा बघावा असा नक्कीच आहे.


अवांतर- यातले काही अनुभव,  काही नाती कोणी अनुभवली असतील तर हा सिनेमा तुम्हाला नक्कीच बांधून ठेवेल.




साधा, निरागस नमकीन



काही काही सिनेमे कादंबरी वाचल्याचा फिल देतात. असाच छान अनुभव देणारा सिनेमा म्हणजे  १९८२ साली प्रदर्शित झालेला गुलजार दिग्दर्शित "नमकीन". 

चित्रपटात मुख्य भूमिकांत वहिदा रेहमान,  शर्मिला टागोर, शबाना आझमी, किरण वैराळे आणि संजीव कुमार आहेत.

गुलजार यांच्या शायरीमधे नेहमी "भेटणारं" , दूर कहीं टिमटिमाती रोशनी से खामोश पहाडी गांव या गोष्टीत मुख्य सहाय्यक भूमिकेत आहे.

यातली गोष्ट, यातली पात्रं आणि प्रसंग फिल्मी नाहीत. ती वास्तवात असूच शकतात म्हणून ही गोष्ट एक चूटपूट लावत मनात घर करते.

ही गोष्ट जिथे घडते ते एक छोटसं, शांत, निवांत पहाडी गाव आहे. इथले शेळ्या चरायला नेणारे लोक मनानं निरागस आहेत. डोक्यावर ओढणी असणाऱ्यां स्त्रिया असण्याचा  तो काळ.  आजच्यासारखा सहा पदरी हायवेंचा आधुनिक काळ नाही. तेंव्हा डोंगरातून नागमोडी वळणं घेत रस्ते गावं जोडत जात. अशाच एका रस्त्यावरचं हे गाव. रहदारीतला एक ट्रक आणि त्याचा ड्रायव्हर  गेरूलाल (संजीव कुमार). रहायला घर शोधत या गावात येतो. सिनेमाची सुरवातच या शोधातून होते. त्याला घर दाखवणारा धनीराम त्याला म्हणतो,"कौन सा तुम शादी के लिए घर देखने जा रहे हो, चार दीवार खड़ी कर उस पर छत डालो, हो गया मकान तैयार।" त्याच्या अशा सांगण्याला कारण आहे ज्या घरात गेरूलाल रहाणार आहे त्या कुटुंबाची परिस्थिती. या कुटुंबात चार स्त्रियाच रहातात. एका जुनाट जीर्ण घरात ज्योती अम्मा (वहिदा) आणि तिच्या तीन तरूण मुली, निमकी, मिठ्ठू, चिनकी रहातात. कोणे एके काळी ज्योती नर्तकी असते आणि सारंगीवादकासोबत लग्न करून तीन मुली पदरात घेऊन  या पहाडी गावात गरिबीत रहात असते. तीन तीन तरूण मुली असणारी आई जशी असू शकते तशीच ती आहे. सगळा गाव या चार स्त्रियांच्या कुटुंबाला चोच मारायला टपलेला असताना धनीसारखा सज्जन मात्र त्यांच्या पोटपाण्यासाठी एखादा चांगला भाडेकरू शोधत असतो. योगायोगानं गेरूलाल या घरात येतो आणि हळूहळू या कुटुंबात मिसळून जातो.  त्याचं निमकीवर (शर्मिला) प्रेम जडतं मात्र वयानं आणि अनुभवानं वडील असलेली निमकी गेरूलालला मिठ्ठूशी (शबाना) लग्न करायचा सल्ला देते. बहिणीचं आयुष्य मार्गी लागावं आणि तिला आवडणारा मुलगा तिला मिळावा हा उद्देश. मात्र गेरूलाल याला मान्यता देत नाही आणि या कुटुंबाच्या आयुष्यातून, त्या गावातून निघून जातो. पुढे काही वर्षांनंतर एका नाटक मंडळीत त्याला नाचणारी चिनकी भेटते. ती आता वडिलांसोबत नाचून पैसा कमवत असते. तिच्याकडून उरलेल्या तिघींबाबत अर्धंमुर्धं कळल्यानं गेरूलाल पुन्हा एकदा त्या गावी जातो. त्या आणखिनच पडक्या झालेल्या जुनाट घरात आता उरलेली असते एकाकी निमकी. 


काळ बदलला असेल, वरवर बघता बर्‍याच सुधारणाही झालेल्या असतील मात्र आजही तीन तरूण पोरींच्या आईचा जिवाचा घोर तोच आहे. आजही अशा वय वाढलेल्या अविवाहित मुली समाजाला चोचा मारायला आवडतात. 

माझ्या आजीला सात मुली त्यामुळे तिचा तो घोर मला ज्योतीच्या जवळचा वाटतो. पटकथा, संवाद, गीतं आणि दिग्दर्शन गुलजार यांचंच आहे आणि त्याकाळी हा काळाच्या पुढचा सिनेमा होता. यातल्या चारही वुमनिया मनानं कणखर आहेत, विचारानं स्वतंत्र आहेत. स्त्रीमुक्तीचे ढोल न वाजवताही आयुष्यानं दिलेल्या अनुभवातून शिकत आपापल्या मार्गांवरून जाणाऱ्या आहेत.


सहसा पोस्टला पोस्टर लावायचा रिवाज असला तरिही मला गाणं जोडण्याचा मोह आवरता येत नाहिए. याचं कारण यातली गाणी खूप सुंदर आहेत आणि दुसरं म्हणजे पोस्टसोबतचं जे गाणं आहे त्यातला निरागस, अस्सल ग्रामीण मूड मला फार आवडतो. तुम्हालाही नक्की आवडेल.

#namkeen #gulzar #shabana_aazmi #sanjeevkumar #ashabhosle



सिनेमातून गायब झालेल्या गोष्टी


आजची आणि थोडी कालची पिढी अनुराग, लव रंजन अशांचे सिनेमे बघत, नेटफ्लिक्स आणि तत्सम बागांत बागडत मोठी झालेली आहे. पण त्याआधीची पिढी जी लहानपणी बच्चननं गुच्ची हाणताना बॅकग्राऊंडला तोंडानं काढलेला भिफ्श्श्श आवाज ऐकत लहानाची मोठी झाली तिच्या सिनेमातल्या असंख्य गोष्टी आज गायब झालेल्या आहेत.  म्हणजे उदाहरणार्थ, पूर्वीचे नायक नायिका प्रणय करत तर ते किती सूचक पध्दतीनं यायचं. अचानक दोन फुलं एकमेकांच्या जवळ येत. यातही साधारण गुलाब लाडकं फूल. झेंडू, सूर्यफूल, घाणेरी, कोरांटी यांच्या नशिबात रोमान्सचा र ही नव्हता. बिचारी. तर ही फुलं जवळ आली की साधारण चारपाच रिळांनंतर ( मेमरी कार्डवाल्यांनो रिळांची मज्जा तुम्हाला कळायची नाही. सिनेमात सुरवातीलाच जे सेन्साॅर बोर्डाचं प्रमाणपत्र झळकायचं त्यात रीत संख्या वाचणं हे ही एक शास्त्र असे आणि मग सिनेमा किती मोठा यावर गंभीर टिपणीही) तर फुलांनंतर चारपाच रिळं झाली की हिरोईनला अचानक ऑक फिलिंग यायचं. मग तिला घरातली एखादी उलटा पल्लू बेदम झापडायची, कलमुंही , कलंकिनी,  खानदान की इज्जत असे शब्द ऐकताना तेंव्हा फार वाईट वाटायचं. (असूदे हो आज्जी. नका रागवू बिचारीला असं सांगायचो आम्ही पण ऐकायचं नाही कोणी) मग हिरोईन डोक्यावर केसाचा तंबू मिरवत,  हातानं पदराच्या टोकाचा कचाकुचीकै करत, फुटेज खात कश्शीबश्शी हिरोला म्हणे की, मै तुम्हारे बच्चे की... मै तुम्हारे बच्चे की ... (पदराचा बोळा तोंडात कोंबत भावनातिरेकाने) मां बननेवाली हूं ( हिरोची भयानक इमोशनल भावमुद्रा आणि बॅकग्राऊंडला आर्त संगीत). पुढे जी काय गोष्ट असेल तसं व्हायचं पण साधारण आपण (म्हणजे त्या वयातले आम्ही) ज्यांना काका काकू, मावशी मामा म्हणू शकलो असतो त्यांचा हा असा रोमान्स आम्हाला बघावा लागलेला. ती फुलं डुलताना आईवडिलांसोबत बघणंही फार असंस्कारी वाटून जायचं (च्यामारी). आता बघा, सरळच या तो बरबाद करदो या तो आबाद करदो... फुलं बिलं नाहीतच. त्या सगळ्या झेंडू कोरांट्यांचे सात्विक शाप भोवले गुलाबांना, बाकी काय नाही.

दुसरी गायब गोष्ट म्हणजे सिनातला "बाबू". शहरातून गावात आलेला हिरो आणि घागराचोलीतल्या हिरॉईनच्या  प्रेमात त्यानं पडणं. तर हा बाबू शब्द वापरणं आता संपलेलं आहे. मुळात अलिकडे बाबू लोकांनी गावाकडे जाणं सोडलं आहे. चला खेड्याकडे हे मनावर घेणं सोडलं आणि बाबू जमात नाहिशी झाली. हे असे शहरातले बाबू येऊन गावातली भारीपैकी चंचल शोख हसिना पटवत मग गावातले स्थानिक बाबू वैतागतच असणार नं? त्यांनी काय करावं? त्यांचे शाप भोवले असणारेत नक्की. त्या घागरेवाल्या नटखट मावशाही गायबच झाल्या आता.

शिलाई मशिनवरची पांढरी साडी निळे काठ, तिचा काॅलेज मे फर्स्ट  बेटा, तिचा तो कध्धीच फ्रेममधे न दिसलेला गाजर का हलवा हे सगळं गायब झालंय. कधीतरी चेंज म्हणून मां नं तोंडल्याची किंवा शेपूची भाजी करायला काय हरकत होती नं?

हे झाले मसालापट पण जरा वेगळे वगैरे सिनेमे असत त्यातल्या त्या संसारात घुसमट होणाऱ्या स्कर्टबाॅर्डर चायनासिल्क मावशाही गायब झालेल्या आहेत. त्यांचा तो मानेवरचा नीट चोपून बांधलेला बन, ओठांवरची वेलवेट रेड ग्लाॅसी लिपस्टिक, चिक्कार काजळयुक्त  डबडबलेले डोळे आणि एखाद्या वाक्यात सांगितलेली घुसमट पहाताना कासावीस व्हायचं. ती उच्चभ्रू आवडीची घरं, ते अर्धे भरलेले चैतन्यकाढ्याचे ग्लास आणि घरात मौन बाळगून फिरणारे ते दोघे... गेले कुठे?  

गच्च पैशेवाला डॅड्डी आपली कार्टी गरीब हिरोच्या प्रेमात पडली की कोरा चेक हिरोला द्यायचा. तसे दिलदार बापही आता दिसत नाहीत. पार्टीत आपली पार्टी परायी झालेली बघून आर्त गाणी भावी सवत्यासमोर गाणारे बॅगी हिरोही गायब झाले.

याशिवाय मोठाले अर्धगोल जिने ज्यावरून हिरोईन दुडूदुडू धावत येई ती घरं गायब झाली. 

हे सगळं गायब झालेलं पुन्हा एकत्र करून एक सिनेमा बनवायला पाहिजे राव. कल्पना करा, सलमान काॅलेजमधून पास होऊन धावत येतो, सोनाक्षी डोक्यावर केसांचा तंबू घेऊन त्याला बच्चे की मांचा डायलाॅग बोलतेय वगैरे. निरागसता गेली राव सिनेमातली.


#nostelgia #allaboutcinema #memories #oldhindimovies

Tuesday, November 26, 2019

सत्तेचा खेळ - वजीर





मराठीमधे राजकीय पार्श्वभूमीवर आधारीत अनेकोत्तम चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. सध्या महाराष्ट्रात जो सत्तेचा खेळ चालला आहे त्यावरून नव्वदच्या दशकात (1994) आलेल्या, 'वजीर' चित्रपटाची प्रकर्षानं आठवण आली.
सचिनछाप सिनेमांमधे भंकस करणार्या अशोक सराफची यात जबरदस्त भूमिका आहे. पांचकट विनोदात हरवलेला अशोक सराफ यात बघताना फार भारी वाटतं. त्यांच्या अनेक आवडत्या भूमिकांपैकी ही मला आवडणारी भूमिका आहे. लोटपोट हसवणारा हाच का तो अशोक सराफ? हा प्रश्न पडावा इतकी दुसर्या टोकाची करडी भूमिका आहे. खुर्चीसाठी, सत्तेसाठी वाट्टेल त्या थराला जाणार्या मुख्यमंत्र्याची , राजकारण्याची भूमिका बघून त्याचा खराखरा राग येतो आंणि अंगावर काटाही.
विक्रम गोखलेंचा पुरुषोत्तम कांबळे हा सल्लागार राजकारणाचे पदर उलगडतो.
एकूणच निवडणुकांचे राजकारण, सत्ता मिळविण्याचं राजकारण, त्यातली गणितं, या गणितांपायी बदलत जाणारे नातेसंबंध, माणसांचा वापर करून घेणं हे सगळं हा चित्रपट उलगडून समोर ठेवतो. काही वास्तव घटनांचा आधार या कथानकाला असल्याचीही त्यावेळेस  चर्चा होती. उज्ज्वल ठेंगडी लिखित याच नावाच्या नाटकावर आधारीत हा चित्रपट होता.

सध्या चाललेल्या खुर्चीखेळावरही भविष्यात एखादा चित्रपट बनेल आणि आज असलेल्या काही प्रश्नचिन्हांची उकल होईल अशी आशा करायला हरकत नाही.
अशोक सराफ, विक्रम गोखले, कुलदीप पवार, चंद्रकांत गोखले, आशुतोष गोवारीकर, ईला भाटे, अश्विनी भावे यांच्या अभिनयासाठी आणि हो, सांज ये गोकुळी गाण्यासाठीही अद्याप पाहिला नसेल तर जरूर पहा - वजीर
#vazir_marathi_movie

तळ टीप- युट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

https://youtu.be/fdEoK-EXkd0



Saturday, September 14, 2019

ड्रीमगर्ल



आयुषमानच्या सिनेमांचा आता एक सफल ढाचा बनला आहे, बिचारा नायक जो चेहर्यावरून निरागस वाटत असला तरिही काड्या करण्यात माहिर असतो. उत्तर भारतातलं एखादं शहर, रिअल लोकेशन्स आणि स्थानिक फ्लेवर , परिस्थितीत अडकत जाणारा नायक, फाॅर्म्युला हिट,  सिनेमा हिट.
ड्रीमगर्लही याच फाॅरम्युल्यामधे बांधलेला चटपटीत आणि चटोरा सिनेमा आहे.
करम (आयुषमान) लहानपणापासूनच एक अवली कला अंगी बाळगून आहे, तो हुबेहूब बायकांच्या आवाजात बोलू शकतो ( हे आपल्याला पटवून   देण्यात आलंय आणि आयुषमानप्रेमापोटी आपण ते पटवूनही घेतो 😜) त्याच्या या हुनरची चिड येणारा त्याचा बाप जगजीत सिंग (अनू कपूर) मयताचं  सामान विकण्याचा धंदा करत असतो. हिरोला हिरॅईन हवीच म्हणून मग एका सामान डिलिव्हरी दरम्यान त्याला माही (नुशरत) भेटते आणि कथेचा एक अध्याय संपतो.कथेचा दुसरा अध्याय करमच्या बेकारीला संपवून त्याच्या त्या अंगभूत कलेमुळे त्याला सेक्सचॅट करणार्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्यानं संपतो. तिसर्या अध्यायात करम पूजा बनून लोकांशी गप्पा मारत तिचा फॅनबेस तयार करताना दिसतो. सिनेमाचा हाच भाग प्रोमो आणि प्रसिध्दीत हायलाईट केलेला असल्यानं लोक पाॅपकाॅर्न घेऊन सरसावून बसतात मात्र प्रत्यक्षात  गरीब गालीबची शायरी,  पायरटेड रफीची गाणी आणि गरीब जस्टिन बिबरच्या बेबीसिटींगमधे पूजा हरवून जाते. इथून पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कळतं, स्क्रिनप्लेवर होल्ड रहात नाही आणि तो ठेवण्याच्या प्रयत्नात प्रसंग आणखिन आणखिन चटकदार करण्याचे प्रयत्न सुरू होतात आणि समोर जे चाललंय ते ताणलं जात असल्याची भावना  मनात येते (निर्माती बालाजीवाल्या एकताची आहे) सुदैवानं रटाळ होण्याइतपत ताणलं न जाता कथा पुन्हा थोडी पटरी पकडते आणि  निरूपणाकडे प्रवास सुरू होतो. खरंतर सुरवातीपासूनच कोणताही विधीनिषेध न ठेवता, आव न आणता जो प्रवास सुरू असतो तो अचानकच लोकांचा एकाकीपणा, त्यातून अपरिचितांशी बोलण्याची गरज भासणं अशा प्रवचनाकडे सरकतो (जे अगदीच अनावश्यक वाटतं ) क्लायमॅक्सला राधे राधे राधे या सुंदर रासलिलेच्या गाण्याचा आधार दिलेला असतो, घागर्यातला आयुषमान आणि पंजाबी सूटमधली नुशरत मिठी बिठी मारून सिनेमा संपवतात आणि मेलं बाॅलिवुडच्या शास्त्राला अनुसरून एक दारूडं फंजाबी स्वांग ढणढण वाजायला लागतं. खरंतर आपण काही खुर्चीतच बसून रहाणार नसतो पण हे द्दारू, नश्शा, कुड्डी ऐकायला येऊ लागल्यानं जरा भरभर बाहेर जातो इतकंच.

थोडक्यात महत्वाचे-
 सिनेमा बघावा का?
-हो
सिनेमा हसवतो का?
-तुकड्या तुकड्यात
प्रोमोमधे वाटतो तसा चावट आहे का?
- नाही.

एक अॅडल्ट विषय लहानमुलांसहित बघणेबल मांडल्यानं खरंतर कौतुकच करायला पाहिजे. नाहीतर काही वर्षांपूर्वी विद्या बालन आणि इम्रानचा घनचक्करनं हा genre  किळसवाणा करून टाकला होता.
असो. विकेंडचा टाईमपास म्हणून हा सिनेमा चांगला आहे .
आयुषमाननं होमपिचवर धमाल केली आहेच पण विशेष उल्लेख करमच्या मित्राच्या भूमिकेतल्या मनजोत सिंगचा करावा लागेल. प्रेमात पडावं इतकं गोड पात्र आहे हे😃 बाकी नुशरत नमक स्वादानुसार रितीला धरून आहे.

#Cसिनेमाचा
#Dreamgirl

Tuesday, September 10, 2019

घिसीपिटी तरिही गोड नेटफ्लिक्स मुव्ही: fall inn love



  .
Fall inn love ही टेलिफिल्मचा ढाचा समोर ठेवून बेतलेली,  बनवलेली romcom movie आहे. दीर्घकाळ लक्षात राहिल अशी नसली तरिही ती बघत गुंतवून ठेवते, प्रत्येक फ्रेम देखणी, रंगरंगीन असल्यानं ताजेपणा वाटतो. सिनेमा अत्यंत गंभीरपणे फुटपट्ट्यांवर मोजणार्यांनी वाटेला नाही गेलं तरिही चालेल कारण भयंकर predictable, cliche नी गर्दी असलेला सिनेमा काहीही नवीन दाखवत नाही. तरिही बोअरिंग दिवसाला ढकलण्यासाठी नक्कीच चांगला सिनेमा आहे, अर्थात तुम्हाला या प्रकारचा सिनेमा आवडत असेल तर.


नोकरीत कटकट, बाॅयफ्रेंड non-committalएकूणच जिंदगीला वैतागलेली कार्पोरेट कन्या गॅब्रिएला दियाझ (क्रिस्टिना मिलिआन्) नशेत एक  random   quiz जिंकते आणि बक्षिसात तिला चक्क न्युजिलॅण्ड मधलं inn मिळतं. नोकरी आणि बाॅयफ्रेंड दोघांनाही सोडून खुद की तलाश में वगैरे ती सॅनफ्रॅन्सिस्को सोडून न्युजिलॅण्ड गाठते. तिथे गेल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो.फोटोतला देखणा inn प्रत्यक्षात पडीक असतो. इथून पुढे जे जे तिच्या बाबतीत घडत जातं ते म्हणजे fall inn love ची गोष्ट.
अपेक्षित वळणं घेत आणि फार मोठे  धक्के न देता सिनेमा संपतो तेंव्हा एक फिलगुड मुव्ही बघितल्याचा अनुभव नक्कीच येतो.
सगळ्या उणिवांकडे दूर्लक्ष करत या सिनेमाचा आनंद घेता येऊ शकतो हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.

https://youtu.be/P9vXNloQfTM

#Cसिनेमाचा
#NETFLIX
#fallinn

Sunday, September 8, 2019

आर्टिकल 15


#SB
हा बहुचर्चित सिनेमा थिएटरमध्ये बघायचा राहून गेला होता. काल नेटफ्लिक्सवर पाहिला आणि एक अस्वस्थता वाटली. तीच शेअर करतेय.

भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.....आहेत? हा प्रश्न स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं उलटल्यावरही अनुभव सिन्हाला आपल्या सिनेमातून विचारावा लागतो. जशी या देशाची समाजव्यवस्था जटील गुंतागुंतीची आहे तसंच या प्रश्नाचं उत्तरही साधं सरळ नाही.
याचं कारण , एका भारतात अनेक भारत नांदतात. एक भारत आहे , ज्यात मी आणि माझ्यासारखेच तुम्ही सगळे रहाता. जातपात मानणं (खासगीत आणि सार्वजनिक जीवनातही) गेल्या दोन पिढ्यांत नाहीसं झालंय. जातीचा काॅलम शाळाकाॅलेजात लिहायच्यावेळेस सरफेसवर येतो तेवढंच.
एक भारत आहे, जिथे या जातीच्या भींती अजूनही अभेद्य आहेत. हे एक वेगळंच जग वाटावं अशा पध्दतीचं सामाजिक वातावरण असणारा देश. दुर्दैवानं या देशाचं अस्तित्व नाकारता येत नाहिए. आर्टिकल 15 हा अत्यंत हुशारीनं लिहिलेला आणि सिनेमॅटिकली मांडलेला सिनेमा आहे. वास्तवातल्या घटनांचा (खरेतर) आधार घेत काल्पनिक मांडणी करताना तो सत्य असत्याच्या तुकड्यांची गोधडी उसवून आपल्यासमोर ठेवतो. सिनेमा कोणाचिही बाजू न घेता तटस्थपणे सगळ्या बाजू कथानकाच्या ओघातच समोर ठेवत जातो. आपण दी एण्डला पोहोचेपर्यंत वास्तवाचं भान घेऊन आलेलो असतो.
उत्तर भारतातल्या एका कसब्यात, जिथे जाती व्यवस्था अजूनही कडवी आहे तिथे शहारात जन्मलेला शिकलेला आणि आजच्या तटस्थ, बदललेल्या, पुरोगामी देशाचं, युथचं प्रातिनिधित्व करणारा तरूण पोलिस अधिकारी येतो. आल्या आल्याच तीन दलित मुलींच्या बेपत्ता असण्याची केस त्याच्या हाती येते. हाती येते म्हणण्यापेक्षा दाबलं 'जात' असलेलं प्रकरण तो बळेच हाती घेतो. या केसच्या अनुषंगाने उलगडत जातो एक 'भारत'. अछुत असलेला भारत, सवर्णपणाचा माज असलेला भारत, अछुतांना 'ते' म्हणत साधं रोजचं माणसासारखं जगणंही नाकारणारा भारत, जन्मासोबत जातीची लेबलं घेऊन आलेली माणसं आणि ही लेबलं कसोशिनं सांभाळणारी माणसं असलेला भारत. तुम्ही आणि मी कधीच न पाहिलेला, अनुभवलेला मात्र ऐकलेला भारत...
जातिच्या उतरंडित ब्राह्मण वर नाक असलेले म्हणतानाच आयनच्या प्रत्येकाला जात विचारण्यातून बहुजनांतही अभिमानानं मिरवले जाणारे जरा वरचे जरा खालचे sc, obc जातीचे शिक्के  दिसतात आणि सगळं किती खोकलं आहे हे उघड होतं. ब्राह्मणांना शिव्या घालताना आपल्या खालच्या जातीवर आकस असणारा बहुजनही दिसतो आणि या देशातल्या किळसवाण्या जातीव्यवस्थेचं उघडं वास्तव नागडं होऊन जातं.

स्क्रिनप्लेमधलं प्रत्येक पात्र फार हुशारीनं क्राफ्ट केलेलं आहे. ब्राह्मण लेबल असणारा पण त्यानं फरक न पडणारा आयन (आयुषमान), ब्राह्मणच  पण त्याचा माज असलेला ब्रह्मदत्त  सिंह (मनोज पहावा), खालच्या जातीतला मात्र कष्टानं शिक्षण घेत पोलिस दलात आलेला जाटव (कुमुद मिश्रा), दलितांचा युवा नेता निषाद (मोहम्मद अयुब) आणि त्याला साथ देणारी त्याची धाडसी प्रेयसी आणि बेपत्ता मुलीतल्या एकीची बहिण गौरा (सयानी गुप्ता). या सगळ्या पात्रांच्या अवती भवती फिरत कथा पुढे सरकत जाते.
कथेचा क्लायमॅक्स एका पातळीवर भावनिक समाधान देणारा तर दुसर्या बाजूला अस्वस्थता देणारा करून योग्य नोटवर दीएण्ड येतो.
मला या सिनेमातली आवडलेली हीच गोष्ट आहे. सिनेमा सगळ्या पलिस्थितीवर 'केवळ भाष्य' करतो. काय असलं पाहिजे याचं लफ्फेदार संवादी स्वरूप किंवा तात्विक भाषण टाळतो मात्र त्याच वेळेस छोट्या छोट्या प्रसंगातून काय असायला पाहिजे यावरही 'सूचक भाष्य' ही करतो.

याचं मस्त उदाहरण म्हणजे, आयन टपरीवालीला जात विचारतो आणि त्याचवेळेस मेरा भारत महान लिहिलेला ट्रक धाडधाड आवाज करत जातो ज्यात तिचा आवाज दबतो.
ऐंशीच्या दशकात येता तर समांतर, आर्ट फिल्मचा शिक्का बसून मुख्यप्रवाहातून बाजूला ठेवला असता हा सिनेमा. मात्र गेल्या काही वर्षांत बाॅलिवुड हटके विषय मुख्यप्रवाहात मांडतो आहे आणि त्याला प्रेक्षकांची (मासची) पसंतीही मिळतेय. एकिकडे प्रेक्षक सिनेमा अधिक चांगल्या पध्दतिनं बघायला शिकला आहे आणि दुसर्या बाजूला आजच्या परिस्थितीत अशा विषयावर, अशी मांडणी करणारा सिनेमा बनविण्याचं स्वातंत्र्य सढळपणानं आहे हे खरोखरच चांगलं चिन्ह नव्हे का?
#articale15
#NETFLIX

Saturday, September 7, 2019

बस 'स्टाॅप' म्हणावा असा

कधी कधी डोक्यावर पडल्यासारखा आपण एखादा सिनेमा बघतो आणि फार मनस्ताप होतो. प्राईमवर असे बरेच मराठी सिनेमे आहेत.
बसस्टाॅप हा मल्टीस्टारर त्यापैकीच एक.  (स्पाॅईलर्स असल्याने कृपया ज्यांना हा सिनेमा बघायचा आहे अशांनी ही पोस्ट वाचू नये. खिक्)
सहनशक्तीचा अंत बघणारा स्क्रिनप्ले हे सर्वात मोठं वैशिष्ट्य. एकजात पकाऊ अभिनय हे दुसरं. वयात येण्याच्या किंचीत पुढच्या वयातल्या मुलांशी आईबापांनी कसं लागावं हे बाळबोध पध्दतीनं आणि काळ्या पांढर्या रंगात चितारणारी कथा. बसस्टाॅपचा शून्य संबंध असणार्या या सिनेमाला क्लायमॅक्सला शब्दबंबाळ संवादात बसस्टाॅपर बळंच नेऊन ठेवलंय.

हा आणि असे सिनेमे बघितले की मला त्या लेखकांचंच कौतुक वाटतं. नाही नाही, कथेबद्दल नाही. तर, अशा कथा निर्मात्याच्या गळ्यात कसे उतरवत असतील म्हणून. या लेखकांसोबत नरेशनला जाण्याची फार इच्छा होते.
असो.
बॅक टु बसस्टाॅप.  अमृता खानविलीरचं पात्र , लाॅजिक काशीत नेऊन ठेवतं, ढोमेचं पात्र डोक्याची काशी करतं तर अनिकेत आणि पूजाचं पात्र नेमकं काय करतंय हेच कळत नाही.

Monday, August 26, 2019

बाॅलिवुडचा नवा patriotism



बाॅलिवुडमधे देशभक्तीपर सिनेमे म्हणजे एकतर जेपी दत्ताछाप वाॅरपट किंवा भारतकुमार म्हणून ओळखल्या जाणार्या मनोजकुमारचे देशभक्तीपर सिनेमे इतकंच सिमित विश्र्व होतं. मात्र गेल्या दोन तीन वर्षात बाॅलिवुडनं या  genre मधे कात टाकत अलिकडचा इतिहास मांडायला सुरवात केली आहे.
साधारण बेबीपासून याचा आगाज झाला आणि व्हाया ऊरी बाटला हाऊस पर्यंत  आपण थेट नावं घेत मांडणी करण्याइतके धीट झालो आहोत.
भारत गेली अनेक वर्षं आतंकवादाशी झुंजत आहे.  आतंकवादाला रंग किंवा धर्म नसतो हे क्लिशे वाक्य प्रचलात येण्याआधीपासूनच एक रंग मात्र सतत याच्याशी जोडला गेला. एक धर्म त्यातल्या सिलेक्टिव्ह कडवेपणासहित सतत आतंकवादी कारवायांमुळे देशाच्या नाही तर जगाच्या बातम्यांत आणि नजरेत येत राहिला.  अलिकडेच आलेले दोन चित्रपट, इंडियाज मोस्ट वाटण्टेड आणि बाटला हाऊस देशात झालेल्या आतंकी  हल्ल्यानंतरच्या धरपकडीवर आधारीत आहेत. आज देशात बरेच बदल झालेले आहेत, असे विषय निर्भिडपणे हाताळता येत आहेत हे चांगलं लक्षण आहे कारण कुठे नं कुठे हे विषय येतात तेंव्हा पार्श्वभूमीला तत्कालीन राजकीय घडामोडींचे पदरही असतात. या दोन्ही चित्रपटांची मला आवडलेली ही महत्वाची बाब हीच आहे की, या पाश्र्वभूमीला कुठेही फोरग्राऊंडवर येऊ न देता, आरोपांच्या फिल्मी फैरी न झाडता विषयाशी प्रामाणिक रहात स्क्रिनप्ले लिहिले साकारले गेले आहेत.
इंडियाज मोस्ट वाॅण्टेड-
अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची कथा , पुण्यातल्या जर्मन बेकरी आणि इतर ठिकाणच्या बाॅम्ब स्फोटांत आरोपी असणार्या , भारताच्या मोस्ट वाॅण्टेड यादीत असणार्या यासिन भटकळच्या मुसक्या बांधण्यात आली त्यावर आहे. बिहार नेपाळ सीमेवर भटकळला अटक करण्यात आली.
चित्रपटाची कथा या ऑपरेशनभोवतीच गुंफली आहे. उगाचंच फापटपसारा  नाही. गुप्तचर संस्थांना हाती लागणारे धागेदोरे आणि त्याआधारे तुटपुंज्या मदतीआधारे केलेली धरपकड बघताना आपण आपल्या सुरक्षयंत्रणांना किती हलक्यात घेतो हे उमजून लाज वाटते.
(मुख्य भूमिकेतल्या अर्जून कपूरनं भूमिका पेलली असली तरिही इथे जाॅन, अक्षय, अभिषेक असं कोणी हवं होतं असं सतत वाटत रहातं.)

बाटला हाऊस
 याच भटकळच्या इंडियन मुजाहिदिननं देशात सिरियल ब्लास्ट करून आतंक माजवला होता. महाराष्ट्र,  गुजरात, राजस्थान, दिल्ली.सगळीच पोलिस दलं अव्याहत   या ब्लास्टमागचे हात आणि मास्टरमाईंड शोधण्यासाठी झटत होते. अशातच दिल्लीच्या स्पेशल सेलला एक धागा हाती लागतो. गजबजलेल्या बाटला हाऊसच्या एका चिंचोळ्या गल्लीतल्या L18 इमारतीत काही आतंकवादी आसरा घेऊन आहेत ही बातमी लागते आणि देशाला हादरवणारं बाटला हाऊस एन्काऊंटर घडतं. हे एन्काऊंटर 2008 साली मिडिया, मानवतावादी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या भूमिकांमुळे सतत उलट सुलट बातम्यात राहिलं. मुळात हे एन्काऊंटर फेक होतं ही या सगळ्यांची भूमिका होती. जिवावर उदार होऊन, एका ऑन ड्युटी ऑफिसरचा प्राण गमावून पार पाडलेल्या या एन्काऊंटरमुळे स्पेशल पेलला judicial inquiry ला सामोरं जावं लागलं.  अनेक निवडणुकांत विविध पक्षांनी त्याचं भांडवलही केलं मात्र सत्याची अनेक versions असली तरिही शेवटी एकच सत्य उशिरा का होईना, समोर येतं. या घटनेनंतर अनेक वर्षांनी एक व्हिडिओ  प्रसारीत झाला ज्यामुळे हे एन्काऊंटर फेक नसल्याचं फायनली सिध्द झालं.
ही इतकी सगळी पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश इतकाच की ताजं सत्तांतर  आणि अलिकडची विवादात अडकलेली घटना असूनही यावर सिनेमा बनविण्याचं धाडस केलं गेलं. मात्र वर म्हणलं तसं हा सिनेमा फक्त या घटनेवर भाष्य करतो. Judicial inquiry ला सामोरं जाताना एकिकडे कर्तव्य आणि दुसरीकडे त्याच कर्तव्यावरचं प्रश्नचिन्ह घेऊन कर्तव्य पार पाडणारा पोलिस फोर्स दिसतो. काहीजणांना हा प्रपोगंडा मुव्ही अगदीच वाटू शकतो पण अनेक सत्यापैकी किंवा सत्याच्या अनेक थिअरीजपैकी पोलिस अधिकारी संजयकुमार याच्या पीओव्हीतून दिसणारं सत्य यात मांडलं गेलं आहे आणि म्हणूनच ते पोलिस यंत्रणेचं सत्य आहे. चित्रपटाला छान गती आहे त्यामुळे तो कुठेही रेंगाळत नाही. फक्त कोर्टप्रकरण फारच पटकन आटपतं असं वाटतं. संजयकुमारांचा एक प्रतिवाद या प्रकरणाचा निकाल लावतो हे फारच बाॅलिवुड स्टाईलनं झालं आहे. वास्तवात ते तितकं सहज नव्हतं.
यात आरोपिंचे वकील त्यांची बाजू मांडतात ते ज्या व्हिज्युअल ट्रिटमेंटनं दाखवलं आहे तो वेगळेपणा आहे. (अशाच पध्दतीची ट्रिटमेंट इत्तेफाकमधेही दिसली होती मात्र इथे ती जास्त परिणामकारक वाटते)
जाॅन अब्राहमला  या प्रकारच्या भूमिका चांगल्या साकारता येतात. त्याचा दगडी  चेहरा अशा भूमिकांना साजेसा आहे. बाकी सगळे जिथल्या तिथे.
-SB


Saturday, October 20, 2018

खुसखुशीत संवादांचा बधाई हो

एक छोटुसा प्लाॅट आणि त्यावर बेतलेलं कथानक. बधाई हो हा एक अत्यंत साधा आणि गोड सिनेमा आहे. ट्रेलरमधे दिसतं तेवढंच चित्रपटाचं कथानक आहे पण ते फुलवलंय अगदी सहजतेनं. फार काही मेलोड्रामा नाही पण घटनाक्रम एकातून एक सहज उलगडत कथा पुढे नेतात. तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. खरंतर एरवी हाॅ फॅक्टर असणारे शब्द अत्यंत सहजतेनं यात ओघात येतात. यातलं शरीरसंबंधाविषयीचं बोलणं उगाचंच बोल्डनेसचा तडका मारण्यासाठी येत नाही तर पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यातून येतं.

दिल्लीतली टिपिकल घरं, भाषा आणि लोकांचे स्वभाव हे इतकं अस्सल आहे की, एखाद्याच्या घरातली खरी गोष्ट बघतोय असं वाटतं.

आयुषमान, नीना, गजराज सगळ्यांचीच कामं अव्वल झाली आहेत. पण खरी धमाल करते ती दादी, सुरेखा सिक्री.
या सिनेमाचा हिरो आहे यातले संवाद. एकामागून एक खटाखट संवाद येत रहातात आणि प्रेक्षकांच्या चेहर्यावरचं स्माईल सतत टिकवून ठेवतात. आयुषमानच्याच शुभमंगलची याबाबतीत आठवण येत रहाते. खुसखुशीत संवादांमुळे गंभीर, बोल्ड विषयही गंमतीदार होऊन जातो.
ज्या जोडप्याचा मुलगा लग्नाला आला आहे असं जोडपं नव्या बाळाची चाहूल लागते आणि बावचळतं. पत्नी बाळाला जन्म देण्याबाबत ठाम आहे मात्र पती जरा गोंधळलेला आहे. केसांत चंदेरी केस चमकायला लागलेल्या या जोडप्याच्या गुडन्यूजनं कुटुंबात आणि परिचितात ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या स्वाभाविक दाखवल्या आहेत. वास्तवातही जर असं काही घडलं तर जशा असतील अगदी तशाच आहेत. पण त्या ज्या पध्दतीनं साकारल्या आहेत ते बघताना मजा येते. हळूहळू बाळाच्या आईबरोबरच इतर सगळे बाळाला स्विकारतात. पन
 सगळं रामायण झाल्यानंतर दादी शेवटी जो एक तडीपार बाॅल मारते त्यानं बेक्कार हसायला येतं😁😁😁


Saturday, September 15, 2018

अनुरागी मनमर्झियां




मनमर्झियां हम दिल दे चुके सनम या सुपरहिट प्रेमकहाणीचा रिमेकसदृश सिनेमा आहे. ट्रेलरवरूनच ते स्पष्ट होत होतं. मग याचा वेगळेपणा काय? का बघावा लोकानी पुन्हा तोच घिसापिटा त्रिकोण? याचं उत्तर अभिषेकची सोकाॅल्ड नवी इनिंग. यातला अभिषेक वेगळाच आहे, वडिलांच्या स्टारडमशी टक्कर देण्याचा त्याचा काळ आता संपलाय, प्रेक्षकांना त्याच्या हिरोगिरीपेक्षा त्याचा अभिनय, भूमिकेतला वावर जास्त महत्वाचा वाटतोय. त्याच्या या मॅच्युरिटीला साजेशा भूमिका जर त्याला मिळत गेल्या तर ही त्याची एक डिसेंट इनिंग ठरेल यात शंकाच नाही.
हम दिल दे चुके सनम मधे अजय देवगण जवळपास अर्धा सिनेमा झाला की येतो. इथे सुरवातीच्या काही मिनिटातच अभिषेक येतो. खेळायला मिळालेल्या जास्तीच्या ओव्हर्स तो मस्त बॅटिंग करतो.
संजय लिला भन्साळीच्या ट्रेडमार्क पोषाखीपटांची सुरवात होता hddcs मोठाले सेट, महागडे पोषाख, सुंदर सुंदर दिसणारी पात्रं, कथेतल्या इमोशन्सही कवितेसारख्या पडद्यावर येणं.... अनुरागचं सादरीकरण अगदी याच्या विरुध्द. तिकडे भव्य सेटस असतील तर इकडे रिअल लोकाशन्सवर कथा वावरते. अम्रितसरच्या जुनकट गल्ल्या, अरूंद बोळ, रंग उडालेली घरं आणि दाटीवाटीनं गल्ल्यात गच्च उभी घरं हे सगळं कथानक   जमिनीवर ठेवायला मदत करतं.
 मुळात अनुरागचं सादरीकरण राॅ जातकुळीतचं. अलवार, हळूवार हे शब्द त्याच्या शब्दकोषातच नाहीत. प्रेमापासून सुडापर्यंत सगळं डार्क शेडमधेच रंगतं त्याच्या पडद्यावर. मनमर्झियांही त्याला अपवाद नाही. कथेत अनावश्यकच सेक्स हे तर त्याचं खास वैशिष्ट्य, अत्यंत गलिच्छ वाटाव्या अशा शिव्या, सिगरेट, दारू यांचे मिनिटा मिनिटाला येणारे सिन्स ही सगळी कश्यपी स्टाईल आहे.  अनुरागच्या कथांतला गुलाबी रंगही करड्यात भिजून येतो.
hddcs चा सगळा हळवारपणा तासून तो कश्यपी मसाल्यात मॅरिनेट होऊन जे समोर येतं, ते म्हणजे मनमर्झियां.
मुख्य तिनही कलाकार मुळातच ताकदीचे आहेत त्यामुळे सिनेमा पकड ढिली सोडत नाही.  एक पूर्ण वेगळा विकी कौशल यात दिसतो. तापसीनं यापूर्वी इतक्या ताकदीच्या आणि वैविध्यपूर्ण मिका केल्यात की हा सिनेमा तिच्यासाठी बच्चों का खेल आहे. रूमी साकारताना तिला किंचितही मेहनत घ्यावी लागली नाहिए. अभिषेक अत्यंत मॅच्युरिटीनं वावरलाय. कश्यपी मसाल्यात स्वतःला त्यानं अजिबात हरवू दिलं नाहिए म्हणून त्याचं विशेष कौतुक.
सिनेमाचा शेवटही बदलला नाहिए. मात्र शेवटाकडे जातानाचा प्रवास छान आहे. hddcs चा शेवट जितका फिल्मी वाटतो तितकाच याचा शेवट सच्चा आणि क्यूट वाटतो.
देव  डी, तनू वेडस मनू, हम दिल दे चुके सनम या सगळ्याची तुरट, तिखट भेळ म्हणजे हा सिनेमा.
लिड कास्ट किंवा अनुराग यापैकी काहीही आवडत नसणार्यानी याच्या वाटेला न गेलेलंच बरं.

उगाच जाता जाता- 1- दोन जुळ्या, नकट्या, बसक्या चेहर्याच्या कन्या एकसारखे कपडे घालून सतत दिसत रहातात. एक वेगळी ट्रीटमेंट म्हणून हे प्रकरण हाताळलं असलं तरिही नंतर नंतर जरा वातच आणतात त्या.
2-एका सिनमधे पोस्टरवरचं भाजपचं कमळ दिसतं. का कुणास ठाऊक, ते लक्षात येतं आणि रहातं.
3- या सिनेमाची जर एखादी टॅगलाईन असती तर ती,'टेक युवर टाईम' असती.
4 - आपल्या घरायल्या तरूण मुलीला भेटायला एक तरूण गच्च्यांवरून उड्या मारून येतो. दार बंद करून जे करायला हवं ते दिवसातून दोनदा करतो (इतकं नियमान कोणी औषधंही घेत नसेल) आणि हे सगळं कुटुंबिय अगदी निव्वांतपणानं मान्य करतात/पचवतात/मूकसहमती देतात . शिवाय तो मुलगा लग्न करत नाही म्हणल्यावर तितक्याच निव्वांतपणानं दुसरा मुलगा शोधतात. मुलगा शोधल्यावर पुन्हा गच्ची हिरो तयार होतो तर निव्वांतपणानं आधीचं लग्न मोडून या गच्ची लग्नाला तयार होतात. हे लग्न मोडलं की पुन्हा बॅक टू स्क्वेअर वनवरही निव्वांतपणानं जातात.आता  हे लग्न हनिमूननंतर तुटल्यावर आधीच्या गच्ची हिरोशी निव्वांतपणानं नव्यानं लग्नाची बोलणी करतात. मुलीचं सासरहून परत आलेलं सामान वाण्याचं सामान आल्यागत शांतपणे बघतात.

हे सगळं बघून वाटतं की अनुरागही त्याच भारतात रहातो का? जिथे उर्वरित भारत रहातो? असो. सौ बात की एक बात, अभिषेक चाहत्यांसाठी हा सिनेमा थंडी हवा का झोंका है. एक बार देखना बनता है



Sunday, May 6, 2018

निरागस सायकल

प्रकाश कुंटेचा आधीचा फक्त काॅफी आणि... पाहिलाय मी. सायकल आणि काॅफीमधे एक गंमतीशीर साम्य आहे. दोनही सिनेमाची वनलायनर अख्खा सिनेमा डोळ्यासमोर आणण्याइतकी साधी आहे.  कदाचित पहिल्यांदा ऐकल्यावर यावर पूर्ण लांबीचा सिनेमा बनण्याइतका कथेचा जीव आहे? असा प्रश्न पडावा. अशा छानशा वनलायनरला फुलवत प्रकाश कुंटे जे काही समोर ठेवतो ते लाजवाब आहे.
अगदी साधी, फारसे नाट्यमय चढउतार नसलेली ही कथानकं सिनेमॅटिकली सादर करताना पडद्यावरून विचलीत होऊ देत नाहीत.
पहिल्या अगदी पंधरा मिनिटातच कथानक कुठला रस्ता पकडून मुक्काम गाठणार हे चाणाक्ष प्रेक्षकानं ओळखलेलं असतं आणि तरिही तो प्रवास, रस्ता हवाहवासा वाटतो आणि सिनेमा संपताना, मुक्कामावर पोहोचताना एक छान स्माईल चेहर्यावर सोडून जातो.
सायकलचं कथानक न सांगता त्याचं कौतुक करणं खरंच कठीण आहे. पण ते सांगायचा मोह आवरणार आहे आणि यातल्या इतर मला भावलेल्या गोष्टींवर बोलणार आहे.
अभिनय- सिनेमाची भट्टी जमायची असेल तर अचूक कास्टिंग होणं फार गरजेचं. कथेतली पात्रं पडद्यावर ती पात्रं म्हणून प्रेक्षकाना पटली तरच तो सिनेमा भिडतो. नाहीतर अमक्या तमक्या स्टारचा सिनेमा अशी ओळख मिरवत कथानक फाट्यावर मारतो.
ह्रषिकेश  जोशी हा केशवदादा म्हणून अक्षरशः पटतो. भोळा, मनानं मोठा केशवदादा ह्रषिकेशशिवाय दुसरं कोणी करू शकेल असं वाटत नाही.
तुकाराम- प्रियदर्शन जाधव. विनोदातूनच ज्याची ओळख झाली असा सेन्सिबल अभिनेता. त्याचं विनोदाचं टायमिंग जितकं जबरदस्त आहे तितकंच भावनिक प्रसंग तरलपणे साकारणंही फार ताकदीचं आहे. यातला त्याचा भामटा चोर दुष्ट किंवा क्रूर नाही तसाच तो रूढार्थानं विनोदीही नाही. प्रासंगिक विनोद घडतात आणि म्हणून तुकाराम क्वचित विनोदाची किनार असणारं पात्र वाटतं. ही तारेवरची कसरत प्रियदर्शननं ज्या सहजतेनं सांभाळलीय त्याला पैकीच्या पैकी मार्क.
दुसरा चोर आहे भाऊ कदम. खरं सांगायचं तर हवा येऊद्यानं या सगळ्यांवरच विनोदाचा एक शिक्का बसवलाय. त्या विनोदाचे साईडइफेक्टस आहेत हे. आभ पब्लिक या सगळ्यांना पाहिलं की आता गदगदून हसायला लावणारे पंच फुटणार अशाच अपेक्षेनं बघते. मागणी तसा पुरवठा नाही झाला तर प्रवाहाबाहेर जायची धास्ती. बरं चोखंदळ प्रेक्षक याना हवापेक्षा वेगळ्या भूमिकेत बघतो तर त्यालाही धास्ती की अरे बाप रे आता इथेही तसलाच विनोद बघायला मिळतो की काय? पण भाऊनी कंट्रोलमधे रहात विठ्ठल चोर साकारलाय. त्याचा निष्पाप चेहरा  आणि भोळसट वागणं इतकं गोड आहे की त्यातून झालेली विनोद निर्मिती खसखस पिकवते.
एक खूप चांगल्या मनाचा ज्योतिषी आणि त्याची जीव की प्राण असलेली सायकल आणि दुसर्या बाजूला चोरी हे कर्म मानून पार पाडणारे पण दुष्ट नसलेले चोर, जे योगायोगानं नेमकी हीच सायकल चोरतात आणि प्रेक्षक म्हणून आपण कोणा एकाची बाजू घेऊच शकत नाही. खरंतर चोरांचा राग यायला हवा पण तो येत नाही.
इतर पात्रात केशवदादाची बायको झालेली दीप्ती लेले खूप शोभून दिसलीय . सहजपणानं कोकणातली सत्तरच्या दशकातली गृहिणी तिनं साकारलीय.
या दोघांची मुलगी असलेली मैथिली पटवर्धनचा उल्लेख केला नाही तर रिव्ह्यू अपूर्ण राहिल. कसली गोड आहे ही चिमुरडी. आणि कामही अगदी ठसक्यात केलंय. बालकलाकार खूप आत्मविश्वासाने काम करतात तेंव्हा ती अगाऊ वाटतात बरेचदा. पाठ केल्यासारखे संवाद बोलल्यानं निरागसता हरवते. इथे मैथिलीने छान मोठे मोठे ( तिच्या वयाच्या मानाने) संवादही तिच्या पडद्यावरच्या वयाला साजेसे म्हणलेत. दिग्दर्शकाचंही यात कौतुक आहेच.
आता महत्याचं म्हणजे या कथेचा बॅकड्राॅप. कोकणातल्या छोट्याशा खेड्यात हे कथानक सुरू होतं आणि मग छोट्या छोट्या गावातून फिरवतं. शेवटी एका धक्क्याला येऊन संपतं. किंवा धक्क्याला लागतं. झपाट्यानं होणार्या शहरीकरणात आपली गावं हरवत चालली आहेत त्यामुळे ही अशी लोकेशन्स मिळणं दिवसेंदिवस कठीण होत जाणारेय. सायकलमधेही त्या काळाशी विसंगत माॅडर्न गोष्टी हळूच डोकावतात पण त्याकडे दूर्लक्ष करायलाच हवं. कारण बाकी पितळ्याच्या भांड्यापासून शेणानं सारवलेल्या भिंती आणि धुवट कपड्यांपर्यंत सगळं अगदी नॅचरल लूकमधे आहे. कोकणातली साधी भोळी माणसं कथानकाच्या ओघात येत जातात आणि कथेतला निरागसपणा अधोरेखित करतात. लक्षात घ्या ही माणसं निरागस दाखवलीत, बावळट नाहीत आणि म्हणूनच ती पटतात.

आपल्या सगळ्यांच्या मनात असाच निरागसपणा दडलेलला असतो मात्र व्यवहारी जगात वावरताना त्याला अट्टाहासानं मनात कुलूपबंद करावं लागतं. या सिनेमाच्या निमित्तानं ते कुलूप काढून कल्पनेतली का होईना एक सायकलराईड बनती है.

Sunday, November 5, 2017

तो क्या हुवा था कल रात को...




एखाद्या जुन्या सिनेमाचा रिमेक आला की जुन्यापेक्षा नवा वेगळा आहे का? जमलाय की फसलाय? ही तुलना अनिवार्य असते.

1969 च्या इत्तेफाक चा रिमेक येणार म्हटल्यावर  उत्सुकता हीच होती की नेमका काय बदल असेल नव्यात? 

69 मधे  नायिका ग्रे शेडमधे दाखविण्याच धाडस यश चोप्रानी दाखवलं हेच खूप. शिवाय ज्या काळात सिनेमातली गाणी जास्त गाजत त्या काळात गाणं विरहीत कथानक सादर करणंही धाडसाचंच होतं.
सर्वात मोठं धाडस म्हणजे अशा कथानकासाठी निवडलेली स्टारकास्ट. 

आता एव्हाना अशी कथानकं, ग्रे शेड असणार्या नायिका/नायक, अॅण्टिहिरो सगळं लोकमान्य झालंय. त्यामुळे प्रेक्षकाना धक्के देणं सोपं राहिलं नाही.

अशा प्रकारच्या सिनेमाचं कथानक जर आधीपासूनच माहित असेल तर आणखिनच कठीण परिक्षा.
आणि या सगळ्या परिक्षांत नवा इत्तेफाक अव्वल गुण घेत पास झालाय.
कथानक माहित असूनही कथेत आपण गुंतत जातो हे सगळ्यात जास्त कौतुकास्पद आहे.
69 चा काळ आणि 2017 मधे प्रचंड फरक आहे. सामाजिक, आर्थिक, तांत्रिक अनेक बाबतीत बदल झालेत या सगळ्याचं प्रतिबिंब नव्या सिनेमात आहे.
अट्टाहासानं जुनं धरून न ठेवता त्यात जे आवश्यक ते बदल केलेत, कथानकाच्या गाभ्याला न हलवता जे बदल केलेत त्यानं नाविन्य आलंय.

इस कहानी के तीन पेहेलू है... हा जुन्या इत्तेफाक मधला संवाद नव्यात आहे . पण इथे अक्षय बाजी मारतो.
जुन्यात इफ्तेकारला किंचीत वायाच घालवलाय असं अक्षयचा नवा पोलिस अधिकारी बघताना वाटतं.
नवा जास्त क्रिस्प बनलाय, अधिक तर्किक वाटतो. उदा. जुन्यामधे वेड्यांच्या हाॅस्पिटलमधला डाॅक्टर नेमका नायिकेच्या ओळखिचा (का? याचं उत्तरही नाही) , नायक नेमका तिच्या घरात घुसतो. (का चं उत्तर नाही) असे अनेक सुटलेले धागे नव्या कथानकात मस्त गुंफलेत आणि आपण त्यात अडकत जातो. 

जुन्यामधे  क्लायमॅक्सला या सगळ्या इत्तफाकचं वर्णन नायक करतो
तसाच नव्यातही करतो पण नव्यातल्या नायकाचं ऐकताना सॅल्यूटच ठोकायला होतं.

अर्थात नव्यातही काही गडबडगुंडे झालेत पण ते दूर्लक्ष करता येतात.

अक्षय खन्नाचा पोलिस अधिकारी आणि  सिध्दार्थचा नायक यांच्यासाठी बघायलाच पाहिजे असा सिनेमा.
#ittefaq #sidharthmalhotra#akshaykhanna#sonakshisinha#ratbakiremix#dhrmapictures